राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.
या सामन्यात प्रतिभाशाली युवा फलंदाज पृथ्वी शॉला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात शतक केले तसेच विंडिजच्या दुसऱ्या डावात क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल या सलामीवीरांचा झेलही घेतला आहे.
त्याने पहिल्या डावात 154 चेंडूत 134 धावा केल्या होत्या. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच ही शतकी खेळी केली होती. यामुळे पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो 6वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापुर्वी पारस म्हांब्रे, आरपी सिंग, आर अश्विन, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनीच पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.
तेव्हाही मिळाला होता सामनावीर पुरस्कार-
विशेष म्हणजे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणही 2017 मध्ये राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरच केले होते. तसेच या सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. तसेच त्याला य़ा सामन्यातही सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
हा सामना मुंबई विरुद्ध तमिळनाडू यांच्यातील रणजी ट्रॉफी 2016-17 च्या मोसमतील उपांत्य फेरीचा सामना होता. शॉने या सामन्यात दुसऱ्या डावात 175 चेंडूत 120 धावांची शतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला होता.
याबरोबरच शॉ हा दुलिप ट्राॅफी, रणजी ट्राॅफी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा भारतातील पहिलाच क्रिकेटपटू आहे.
महत्वाच्या बातम्या-