हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला, ज्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय खेळाडूंवर टीका केली जात आहे. दरम्यान माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हक यांनी देखील भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाला पहिल्या डावात अवघ्या ७८ धावा करता आल्या. ज्यामुळे इंजमाम उल हक यांनी भारतीय फलंदाजांवर जोरदार टीका केली.
त्यांनी म्हटले की, “भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांवर कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ दिला नाही. एक खेळाडू म्हणून मी म्हणेल की, खेळपट्टी कशीही असो, २०-२५ चेंडू खेळून झाल्यानंतर आपला हात आणि डोळे खेळपट्टीसोबत समन्वय साधू लागतात. त्यानंतर तुम्ही मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकता. रोहित शर्माने १०५ चेंडूंचा सामना केला. तुम्ही असं मुळीच म्हणू शकत नाही की, १०५ चेंडू खेळूनही तुम्ही सेट झाले नाहीत. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्हाला फटकेबाजी देखील करावी लागेल.”
“विराट कोहलीने देखील ३१ चेंडूंचा सामना केला. परंतु त्याने काय केले? तो अवघ्या सात धावा करत माघारी परतला. यादरम्यान देखील तो अडचणीत असल्याचे दिसून आले. इंग्लंडला तुम्ही काही दिवसांपूर्वीच पराभूत केले आहे. तुम्ही चौथ्या दिवशी कोरड्या खेळपट्टीवर त्यांच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले पाहिजे होते. भारतीय संघ खेळपट्टीवर असलेल्या ओलाव्याचा फायदा घेऊ शकला असता. मी असे म्हणत नाहीये की, इंग्लंड संघाचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आला असता. पण इंग्लंडला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नसती,” असे इंजमाम उल हक म्हणाले.(Inzamam ul haq criticized rohit sharma And Virat kohli)
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ आकडेवारीमुळे बांधले गेलेत कोहलीचे हात, फ्लॉप ठरुनही पुजारा अन् रहाणेला करु शकत नाही संघाबाहेर