आयपीएल २०२० मध्ये जगभरातील अनेक धडाकेबाज फलंदाज खेळताना दिसत आहेत. ते त्यांच्या संघासाठी बर्याच धावाही करतील. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. म्हणून आज आपण या खास लेखात त्या 5 दिग्गज फलंदाजांबद्दल चर्चा करणार आहोत, जे आयपीएल २०२० मध्ये ५०० पेक्षा जास्त धावा करू शकतात.
आयपीएल २०२० मध्ये ५०० पेक्षा अधिक धावा करू शकणारे ५ फलंदाज- ipl 2020 5 players 500 runs season
रोहित शर्मा
रोहित शर्मा सध्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तो प्रत्येक स्वरूपात जबरदस्त धावा करताना दिसला. आयपीएलच्या या हंगामात तो आपल्या फलंदाजीने जबरदस्त धावा करताना दिसेल आणि या आयपीएलदरम्यान तो ५०० पेक्षा जास्त धावा करू शकतो.
रोहित शर्मा आयपीएल २०१३ मध्ये ५०० धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला होता. आता यावर्षी तो ही कामगिरी करु शकतो. रोहित शर्माने आयपीएलमध्ये एकूण १९१ सामने खेळला आहेत. त्यात त्याने ३१.६३ च्या सरासरीने एकूण ४९९८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३०.९७ आहे.
या स्टार फलंदाजाने आयपीएलमध्ये एक शतक आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत आणि या टी२० स्पर्धेत त्याच्या बॅटने ४३६ चौकार आणि २०१ षटकार ठोकले आहेत. यंदाच्या हंगामात त्याने ३ सामन्यात १०० धावा केल्या आहेत. त्यात त्याने १ अर्धशतक झालेले आहे.
जोस बटलर
इंग्लंडकडून खेळताना जोस बटलरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिकेत आपला फॉर्म दाखविला आहे. त्याचा शानदार फॉर्म पाहता आयपीएल २०२० मध्ये त्याच्यासाठी ५०० धावा करणे अवघड नाही.
जोस बटलर हा राजस्थान रॉयल्स संघाचा आधारस्तंभ आहे. यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाला जबरदस्त कामगिरी बजावायची असेल, तर जोस बटलरची फलंदाजी होणे फार महत्वाचे आहे. जोस बटलरदेखील या संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका साकारणार आहे. तसेच फ्रँचायझी त्याचा वापर सलामी फलंदाज म्हणून करत आहे.
जोस बटलरने आयपीएल कारकिर्दीतील ४६ सामन्यांत ३४.७५ च्या सरासरीने आणि १५०.१० च्या स्ट्राइक रेटने १३९० धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ९ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएल २०१८ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात त्याने १ सामना खेळला असून फक्त ४ धावा केल्या आहेत.
केएल राहुल
केएल राहुलची आयपीएल कारकीर्द खूप प्रभावी आहे. त्याने ४४.८७ च्या सरासरीने ७० आयपीएल सामन्यांमध्ये २१९९ धावा केल्या आहेत. यावेळी राहुलचा स्ट्राइक रेट १३९.७९ आहे. त्याने आयपीएलमध्ये १७ अर्धशतक आणि २ शतक झळकावले आहे.
आयपीएल २०१८ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा तिसरा फलंदाज होता. आयपीएल २०१९ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. या दोन्ही मोसमात त्याच्या फलंदाजीतुन ५०० हून अधिक धावा आल्या होत्या.
या मोसमातही तो ५०० धावा करणार असे दिसत आहे. या हंगामात तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार देखील आहे आणि पहिल्यांदाच त्याच्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
या १३ व्या आयपीएल हंगामात त्याने ३ सामन्यात २२२ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याच्या फलंदाजीतून १ शतक आणि १ अर्धशतक झळकले आहे. यंदाच्या हंगामात सध्या तो सर्वाधिक धावा करण्यात अव्वल स्थानी आहे. त्याची ही कामगिरी पाहता तो ५०० चा आकडा नक्की पार करेल.
डेविड वॉर्नर
डेविड वॉर्नर त्याच्या शेवटच्या ५ आयपीएल हंगामापासूनच ५०० धावांचा टप्पा ओलांडत आहे, त्यामुळे आयपीएल २०२० मध्ये हा ५०० चा आकडा पार करणे त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही.
त्याची आयपीएल कारकीर्द खूप चांगली राहिली आहे. त्याने १२८ सामन्यात ४३.१७ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि १४२.११ च्या भक्कम स्ट्राईक रेटने एकूण ४७४८ धावा केल्या आहेत. या खेळाडूने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ४४ अर्धशतकेही केली आहेत. तसेच या फलंदाजाने आयपीएलमध्ये ४६१ चौकार आणि १८२ षटकार लगावले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो कर्णधार आहे. तो आयपीएलच्या प्रत्येक हंगामात चांगले प्रदर्शन करतो. आयपीएल २०१९ मध्ये वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली होती. तसेच २०१५ आणि २०१७ मध्येही वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली होती. या हंगामात त्याने २ सामन्यात २१ च्या सरासरीने ४२ धावा केल्या आहेत.
विराट कोहली
विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलचे एकूण १८० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.२२ च्या सरासरीने ५४३५ धावा केल्या आहेत.
या अनुभवी फलंदाजाने ५ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहलीचा स्ट्राईक रेट १३१.१८ आहे आणि त्याची सर्वाधिक ११३ धावा आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ५ वेळा ५०० धावांचा आकडा गाठला आहे, त्यामुळे आयपीएल २०२० मध्ये पुन्हा एकदा आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर हा ५०० चा आकडा गाठू शकतो. या हंगामात त्याने ३ सामन्यात फक्त २३ धावा केल्या आहेत.
विराटच्या नेतृत्वात आरसीबी संघाला अद्याप आयपीएल विजेतेपद जिंकता आले नाही. त्यामुळे या हंगामात विराट आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने आपल्या संघाला चॅम्पियन बनवू इच्छित आहे.