आयपीएल २०२२ची (IPL 2022) रणधुमाळी सुरू आहे. रविवारी (२९ मे) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. राजस्थानचा संघ १४ वर्षांची आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्यााठी या सामन्यात आपला पूर्ण जोर लावताना दिसेल. तर पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरलेला गुजरात संघ ट्रॉफी जिंकत इतिहास रचण्यासाठी आतुर असेल.
तत्पूर्वी गुजरातला मजबूत संघ (Gujrat Titans Strength) बनवणाऱ्या काही बाबींवर नजर टाकूया, ज्यामुळे त्यांना अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास करता आला आहे. तसेच याच बाबी त्यांना अंतिम सामना जिंकवत आयपीएल विजेताही बनवू शकतात.
गुजरात टायटन्सला तगडा संघ बनवणाऱ्या ५ बाबी-
१. पावरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी
गुजरात संघाच्या यशामागे त्यांच्या गोलंदाजांच्या पावरप्लेमधील कामगिरीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. गुजरात संघाने आतापर्यंतच्या अधिकतर सामन्यांमध्ये सुरुवातीच्या षटकांत विकेट्स गेत प्रतिस्पर्धी संघावर दबाव बनवला आहे. गुजरात संघाने चालू हंगामात पावरप्लेमध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थाननेही पावरप्लेमध्ये गुजरातइतक्याच २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात पावरप्लेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारे २ संघ आमनेसामने असतील.
२. षटकारांपेक्षा चौकारावर जास्त जोर
गुजरात संघाने आतापर्यंत फलंदाजीत जास्त जोखीम न घेण्याची रणनिती वापरली आहे, जी यशस्वीही ठरली आहे. याच कारणामुळे गुजरातच्या खेळाडूंच्या या हंगामात सर्वात कमी ७५ षटकार मारले आहेत. मात्र चौकार मारण्याच्या बाबतीत गुजरातचा संघ पहिल्या २ संघांमध्ये आहे. गुजरातकडून फलंदाजांनी सर्वाधिक २०७ चौकार मारले आहेत. याच रणनितीच्या जोरावर गुजरातने सामन्यांमध्ये विजयासाठी पुरेशा धावा बनवल्या आहेत.
गुजरातने चालू हंगामात ८ सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ७ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, हे सातही सामने गुजरातने शेवटच्या षटकात जिंकले आहेत.
३. प्रत्येक सामन्यात गुजरातकडे गोलंदाजीसाठी ७ पर्याय
गुजरात संघाच्या यशामागे त्यांच्या गोलंदाजी फळीचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आव्हानाचा पाठलाग करणे असो वा आव्हानाचा बचाव करणे असो, गुजरात संघाकडे नेहमी गोलंदाजीसाठी ७ पर्याय उपलब्ध राहिले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्याबाबत बोलायचे झाल्यास गुजरातकडे कर्णधार हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राशिद खान, साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल आणि मोहम्मद शमींसारखे गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे कर्णधार परिस्थितीनुसार गोलंदाजांना निवडू शकतो.
४. संघाच्या गरजेनुसार मिळाला नवा फिनिशर
गुजरात संघाकडे फिनिशर्सचीही भरमार आहे. अंतिम षटकांमध्ये संघाला गरज असताना वेगवेगळ्या खेळाडूंनी फिनिशरची भूमिका बजावली आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या २०व्या षटकात डेविड मिलरने सलग ३ षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच राहुल तेवतियानेही आरसीबीविरुद्ध २५ चेंडूत ४३ धावांची मॅच फिनिशिंग खेळी केली होती. तसेच राशिद खाननेही संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिले आहेत. लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात मार्को जेन्सनला शेवटच्या षटकात ३ चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकत राशिदने संघाला सामने जिंकून दिले आहेत.
५. हार्दिकचे नेतृत्त्व कौशल्य आणि संघाची एकजुट
नेतृत्त्वपदाचा कसलाही अनुभव नसताना हार्दिक पंड्याने स्वतमधील नेतृत्त्व कौशल्य सिद्ध केले आहेत. त्याने बऱ्याचशा सामन्यांदरम्यान महत्त्वाचे निर्णय घेत संघाला सामने जिंकून दिले आहेत. तसेच त्याने कर्णधार म्हणून मैदानावर असताना आपल्या वागणूकीवर लक्ष दिले आणि आपल्या आक्रमक स्वभावाला नियंत्रणात ठेवले आहे. तसेच त्याने संघाच्या गरजेनुसार आपली फलंदाजी शैली बदललेली आहे. त्याने तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत डाव सावरण्याचे काम केले आहे. तसेच त्याने संघासाठी विस्फोटक खेळीही केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL फायनलमध्ये राजस्थानसाठी बटलरची फलंदाजीच नाही, तर ‘या’ ५ गोष्टीही ठरू शकतात जमेची बाजू
IPL Final | विजेत्या-उपविजेत्या संघावरच नाही, तर पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही पडणार पैशांचा पाऊस