आयपीएल २०२२मध्ये अनेक यष्टीरक्षक फलंदाजांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या जोरावर प्रभावित केले आहे. रिषभ पंतला सध्या भारतीय संघाच्या यष्टीरक्षकासाठी पहिली पसंती मिळत आहे. रिद्धिमान साहा, इशान किशन, संजू सॅमसन आणि अजून काही युवा खेळाडू भारताच्या यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी नेहमीच प्रतिक्षेत असतात, पण अशातच आता माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने एका नवीन यष्टीरक्षकाला संघात सामील करण्याची मागणी केली आहे.
पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (७ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमना सामना झाला. राजस्थान रॉयल्सने हा सामना ६ विकेट्सने नावावर केला. पंजाबचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा (Jitesh Sharma) याने सामन्यात चांगले प्रदर्शन केले. त्याने अवघ्या १८ चेंडूत नाबाद ३८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. जितेशच्या ताबडतोड फलंदाजीमुळे पंजाबने मर्यादित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा उभ्या केल्या. जितेशचे हेच प्रदर्शन पाहून भारताचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) चांगलाच प्रभावित झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एका वृत्तसंस्थेशी बोलताना विरेंद्र सेहवाग म्हणाला की, “यात कसलीच शंका नाही की, जितेश शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. इशान किशन, रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा हे सर्व यष्टीरक्षक फलंदाज आहेत, पण जितेशने मला प्रभावित केले. त्याचे कौशल्य निर्भीडपणे फलंदाजी करण्याचे आहे.”
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. सेहवागच्या मते निवडकर्त्यांनी जितेशला या विश्वचषक स्पर्धेसाठी पर्यायी यष्टीरक्षकाच्या रूपात सामील केले पाहिजे. सेहवाग म्हणाला की, “यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी जितेश शर्माला पर्यायी यष्टीरक्षकाच्या रूपात घेऊन जायला पाहिजे.”
जितेशने खेलेल्या धमाकेदार खेळीतील काही शॉट सेहवागला खूपच आवडले. याविषयी बोताना तो म्हणाला की, “जितेशच्या एका स्ट्रोकमुळे मला व्हीव्हीएस लक्ष्मणच्या एका शॉटची आठवण आली. लक्ष्मण असाच शॉट शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर मारायचा.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर १९० धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात राजस्थानने हे लक्ष्य ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकात गाठले. राजस्थानसाठी यशस्वी जयसवालने सर्वाधिक ६८ धावांचे योगदान दिले, तर पंजाबसाठी सलामीवीर जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक ५६ धावा केल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार राजस्थान रॉयल्सला झटका, अर्ध्यातून मॅच विनर फलंदाजाची घरी रवानगी
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय