भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सातत्याने वक्तव्ये येत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, विराट कोहलीसोबत टी२० च्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर ८ लोकांच्या उपस्थितीत चर्चा झाली.
या बैठकीत विराटला स्पष्टपणे विचारण्यात आले की, टी२० चे कर्णधारपद सोडणे योग्य आहे का? या बैठकीला विराटशिवाय आठ जण उपस्थित होते, त्यात पाच निवड समिती सदस्य, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly), सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा समावेश होता.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
सौरव गांगुली हे विराटच्या पत्रकार परिषदेनंतर संतापले असून, बीसीसीआयमध्ये गोंधळाची स्थिती आहे. विराटने बीसीसीआय अध्यक्षांना दिलेल्या विधानाच्या विरोधाभासामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयने कोणतेही विधान जारी केल्यास कसोटी कर्णधार खोटा असल्याचे सिद्ध होईल आणि त्याचा परिणाम संघाच्या मनोबलावर होईल. त्याचबरोबर मंडळाने निवेदन न दिल्यास अध्यक्षांवर प्रश्न निर्माण होतील. विराटच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, त्यामुळे बोर्ड आणि कर्णधार यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याने टी२० कर्णधारपद सोडण्याची घोषणा करताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांनीच त्याचा निर्णय योग्य ठरवला होता. त्याचवेळी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याची माहिती निवड समितीने कसोटी संघाची घोषणा होण्याच्या दीड तास आधी दिली होती. (Virat Kohli Press Conference)
गांगुली यांनी केला होता वेगळा खुलासा
विराटच्या या पत्रकार परिषदेपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. विराटला टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास मनाई करण्यात आली होती, असे गांगुली यांनी म्हटलेले. विराटला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी आणि बीसीसीआयने संयुक्तपणे घेतला होता. कारण, मर्यादित षटकांच्या संघामध्ये आम्हाला एकच कर्णधार हवा होता. अशा परिस्थितीत विराटला हटवून रोहित शर्माकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले, असे त्यांनी सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
लखनऊ संघाच्या प्रशिक्षकपदाची रेस अखेरीकडे? ‘हा’ दिग्गज आघाडीवर
आता विराटवर होणार ‘दादागिरी’! स्वतः बीसीसीआय अध्यक्षांनी दिले संकेत
सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ