देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा इशान किशनचा दबदबा दिसून आला आहे. गुरूवारी (१० ऑगस्ट) त्याच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागाने तब्बल 13 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये त्याने केवळ नेतृत्वच नाही तर फलंदाजीतही कमाल केली आहे. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या दक्षिण विभागाविरुद्धच्या या अंतिम सामन्याच्या दोन डावांमध्ये इशानने द्विशतक आणि अर्धशतक करत 65 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
इशानने पूर्व विभागाच्या पहिल्या डावात ३० चौकार आणि ७ षटकारांसह २७० धावा केल्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ९ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा केल्या. या खेळींसह इशानने ६५ वर्ष जुना विक्रम मोडून एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.
इशानने या अंतिम सामन्यात तब्बल ३५० धावा केल्या. यामुळे तो या स्पर्धेच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. १९६१ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच एका फलंदाजाने ३५० धावांचा टप्पा गाठला आहे. याआधी हा विक्रम रमण लांबा यांच्या नावावर होता.
उत्तर विभागाकडून खेळणाऱ्या रमण यांनी १९८७ मध्ये पश्चिम विभागाविरुद्धच्या पहिल्या डावात ३२० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्यांनी फलंदाजी केली नाही. आता जवळपास चार दशकांनंतर त्यांचा विक्रम मोडला गेला आहे.
इशानने दोन धमाकेदार खेळी केल्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. तो दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा विकेटकीपर-फलंदाज ठरला.






