टीम इंडियाने अलिकडच्या वर्षांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक संस्मरणीय कसोटी जिंकल्या आहेत. पण, २०१४ मध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारताने इंग्लंडवर मिळवलेला विजय खरोखरच खास होता, कारण या मैदानावर टीम इंडियाचा २८ वर्षांचा दुष्काळ संपला. या विजयाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ठरला. त्याने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि लॉर्ड्स कसोटीत भारताला ९५ धावांनी विजय मिळवून दिला. या कसोटी सामन्याचा निकाल आज म्हणजेच २१ जुलै २०१४ रोजी लागला. भारताने १९८६ नंतर लॉर्ड्सवर एक कसोटी जिंकली होती आणि यासह टीम इंडियाने सलग १० कसोटी जिंकणाऱ्या इंग्लंडच्या विजयी मोहिमेला ब्रेक लावला होता. तीन वर्षांनंतर घराबाहेर कसोटीत भारताचा हा पहिला विजय ठरला. सामन्याच्या चौथ्या डावात इशांतने ७४ धावा देत ७ विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
लॉर्ड्सवर झालेल्या या कसोटीत भारताने यजमान देशाला ३१९ धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना एकवेळ इंग्लंडची धावसंख्या ४ गडी बाद १७३ अशी होती. पण, यानंतर इंग्लिश डाव फसला आणि संपूर्ण संघ २२३ धावांत ऑलआऊट झाला आणि भारताने हा सामना ९५ धावांच्या फरकाने जिंकला. एकट्या इशांतने संपूर्ण इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले आणि त्याने ७ विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी इशांतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दुसऱ्या डावात इशांतने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले, तर भुवनेश्वर कुमारने पहिल्या डावात हे काम केले. त्याने ८२ धावांत ६ बळी घेतले.
https://www.instagram.com/p/CC5KHRwA-wR/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
भारताने १९८६ मध्ये लॉर्ड्सवरील कसोटी जिंकली होती
भारताने याआधी १९८६ मध्ये लॉर्ड्सवर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली कसोटी जिंकली होती आणि त्यानंतर दुसऱ्या विजयासाठी २८ वर्षे वाट पाहावी लागली होती. यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर विजयाचा मुकूट बांधला गेला. अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ३१९ धावा करत आघाडी घेतली. मुरली विजय (९५), रवींद्र जडेजा (६८) आणि भुवनेश्वर कुमार (५२) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३४२ धावा केल्या. इंग्लंडला ३१९ धावांचे लक्ष्य मिळाले. पण, जुन्या चेंडूने इशांतच्या शॉर्ट बॉलिंगसमोर इंग्लिश गोलंदाजांनी शरणागती पत्करली आणि लॉर्ड्सवर ८२ वर्षात भारताला दुसरा विजय मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वेस्ट इंडिज दौऱ्यातून भारताला मिळणार नवे सितारे, ‘या’ खेळाडूंना आपली कला दाखवण्याची संधी
कसून सराव, पौष्टिक आहार आणि भरपूर झोप- स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा युवकांना सल्ला





