भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा मंगळवारी विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्लीचे नेतृत्व करताना दिसला. तब्बल सात वर्षांनंतर ईशांतकडे दिल्लीच्या कप्तानीची धुरा सोपवण्यात आली होती आणि या सामन्यात त्याने एक खास टप्पाही गाठला. ईशांतने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये आपले 200 बळी पूर्ण केले आहेत. त्याने विदर्भाचा सलामीवीर अथर्व तायडेला 25 व्या षटकात बाद करून ही कामगिरी केली. तायडेने 72 चेंडूत 62 धावांची खेळी केली होती आणि दुसऱ्या विकेटसाठी ध्रुव शौरीसोबत 90 धावांची भागीदारी केली होती, त्यामुळे ही विकेट दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.
ईशांतच्या 200 लिस्ट-ए विकेट्सपैकी 115 विकेट्स एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमधील आहेत. त्याने 2007 मध्ये वनडे पदार्पण केले होते आणि दीर्घकाळ तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता. 2016 नंतर तो या फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळला नसला, तरी घरगुती क्रिकेटमध्ये तो सातत्याने सक्रिय आहे आणि दिल्लीसाठी नियमितपणे खेळत आहे.
या मोसमात ईशांत दिल्लीसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने सात सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनमी रेट 3.69 राहिला आहे. त्याच्या प्रदीर्घ अनुभवामुळेच दिल्लीला विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत (Knockout stage) पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे.
रिषभ पंतच्या अनुपस्थितीत ईशांतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतने साखळी फेरीत संघाचे नेतृत्व केले होते, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. दरम्यान, दुखापतीमुळे पंतला त्या मालिकेतून बाहेर व्हावे लागले. दिल्लीने सुरुवातीला आयुष बदोनीकडे कमान सोपवली होती, पण वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यामुळे बदोनीला भारतीय संघातून बोलावणे आले. अशा परिस्थितीत अनुभवाचा विचार करून ईशांत शर्माकडे नेतृत्व देण्यात आले.
ईशांतने घेतलेल्या महत्त्वाच्या विकेटनंतरही विदर्भ संघ 300 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यश राठोडने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत 66 चेंडूत 80 धावा कुटल्या. दिल्लीकडून नवदीप सैनी आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर नितीश राणाने आपल्या पार्ट-टाइम स्पिनच्या जोरावर दोन महत्त्वाचे बळी टिपले.






