विराट कोहली याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटसोबत जवळचे संबंध असेलेले भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यापूर्वीही विराटने कर्णधारपद सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बोलले आहेत. आता पुन्हा एकदा शास्त्री विराटच्या या निर्णयावर व्यक्त झाले आहेत. शास्त्रींच्या मेत विराटने कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे आणि याचा त्याला फायदा मिळणार आहे. पण, त्यांच्या मते विराटने कसोटी कर्णधारपद सोडायला नको होते.
रवी शास्त्री (Ravi Shastri) इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलत असताना विराट कोहली (Virat Kohli) याच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर व्यक्त झाले. ते म्हणाले, “इमानदारीने सांगायचे तर याचा (कर्णधारपद सोडण्याचा) त्याला अप्रत्यक्षपणे फायदाच होऊ शकतो. कर्णधारपदाचा दबाव त्याच्या खांद्यावरून उतरला आहे. कर्णधाराकडून जी अपेक्षा केली जाते, ती आता नसेल. आता तो स्वतःला चांगल्या प्रकारे सादर करू शकतो. मोकळेपणाने खेळू शकतो आणि मला वाटते तो असे करेलही.”
“मला वाटते की, त्याने कर्णधारपद सोडून समजूतदारपणे निर्णय घेतला आहे. मला चांगले वाटले असते, जर तो भारताच्या कसोटी कर्णधारपदावर कायम राहिला असता. परंतु, ही त्याची वैयक्तिक निवड आहे. मला वाटते की, सर्वात महत्वाचे हेच आहे की, त्याने स्वतःच्या प्रदर्शनाविषयी चिंता करू नये. कारण त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसे काम केले आहे,” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
शास्त्रींच्या मते भारतीय संघाच्या कर्णधाराला कोणत्याही इतर संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक दबाव सहन करावा लागतो. ते म्हणाले की, “खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये एका संघाचे नेतृत्व करणे सोपे नसते, खासकरून भारताचे, जिथे तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा असते. भारतीय संघाच्या कर्णधाराच्या तुलनेत इतर कोणत्याही संघाच्या कर्णधाराला कमी दबाव झेलावा लागतो. कारण याठिकाणी एक अब्जपेक्षा अधिक लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा खूपच जास्त असतात.”
विराटने भारतीय संघाचे नेतृत्त्व सोडल्यानंतर तिन्ही क्रिकेट प्रकारासाठी रोहित शर्माकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 मध्ये विदेशी खेळाडूंची भरमार, जाणून घ्या कोण करणार कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व
‘एक अविस्मरणीय अध्याय’! सीएसकेचे नेतृत्त्व सोडल्याबद्दल ‘कॅप्टनकूल’ धोनीसाठी विराटही भावूक
आठवण ‘त्या’ सामन्याची, जेव्हा पाकिस्तानने बलाढ्य इंग्लंडला धूळ चारत उंचावला होता विश्वचषक