भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फलंदाजी केली. उपकर्णधार पंतने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावले. पंतने पहिल्या डावात 134 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात पंतने 118 धावांची खेळी केली. यानंतरही भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात आतापर्यंत 6 शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे पंतने परदेशात जेव्हा जेव्हा शतक केले, तेव्हा भारतीय संघाला कधीच विजय मिळवता आलेला नाही.
पंतने परदेशात आतापर्यंत एकूण 6 शतके ठोकली आहेत. पंतने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या कठीण खेळपट्टीवर भरपूर धावा केल्या आहेत. पंतने भारतीय संघासाठी (Team india) अशा आव्हानात्मक परिस्थितीत जबरदस्त फलंदाजी केली आहे. पण दुर्दैवाने भारतीय संघाला या एकाही सामन्यात विजय मिळू शकलेला नाही. पंतने ऑस्ट्रेलियात एक, दक्षिण आफ्रिकेत 1 आणि इंग्लंडमध्ये 4 शतके केली आहेत. या काळात भारताला 6 पैकी 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला होता.
पंतचा हे रेकॉर्ड खरं तर थोडा धडकी भरवणारं आहे. पण भारतीय संघाला नक्कीच हे अपेक्षित असेल की, पुढच्या सामन्यात हे रेकॉर्ड मोडावं. टीम इंडियाला हवं असेल की, पंतने पुन्हा एकदा संघासाठी चांगली खेळी करावी आणि शानदार शतक ठोकावं, पण यावेळी निकाल भारताच्या बाजूने असावा.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test Series) यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघममधल्या एजबेस्टन क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला 2 जुलैपासून सुरुवात होईल. इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला या कसोटी सामन्यांत काहीही करून विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे.