टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेटचा पल्ला गाठला आहे. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो 10वा गोलंदाज ठरला. वेगवान गोलंदाजांबाबत बोलायचं झाल्यास, हा टप्पा गाठणारा तो केवळ 6वा भारतीय पेसर आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत बांगलादेशनं 112 धावांत 8 विकेट गमावल्या. ब्रेक पूर्वी बुमराहनं हसन मेहमूदला विराट कोहलीच्या हाती झेलबाद करून बांगलादेशाला आठवा धक्का दिला. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 400वा बळी ठरला.
जसप्रीत बुमराहपूर्वी कपिल देव, जगवाल श्रीनाथ, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे. कुंबळे, अश्विन, जडेजा आणि हरभजन फिरकीपटू असून बाकी सर्व वेगवान गोलंदाज आहेत. बुमराहनं सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत बांगलादेशच्या तीन विकेट घेतल्या होत्या.
भारतासाठी सर्वात कमी डावांत 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबाबत बोलायचं झाल्यास, बुमराह या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आर अश्विननं 216, कपिल देवनं 220, मोहम्मद शमीनं 224 आणि अनिल कुंबळेनं 226 डावांत ही कामगिरी केली. बुमराहनं 227 डावांत हा रेकॉर्ड आपल्या नावे केला. यानंतर हरभजन सिंगचा क्रमांक लागतो, ज्यानं 237 डावांत 400 विकेट घेतल्या.
जसप्रीत बुमराह जानेवारी 2016 मध्ये भारतासाठी टी20 द्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं 70 टी20, 89 वनडे आणि 36 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. टी20 मध्ये बुमराहनं 89 विकेट घेतल्या असून वनडे आणि कसोटीत अनुक्रमे 149 आणि 159 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बांगलादेश कसोटीत प्रमुख गोलंदाज जखमी; अर्ध्यातच मैदान सोडलं
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची कमाल! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
हसन महमूदची भारताविरुद्धही शानदार कामगिरी, असं करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू