इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ च्या बरोबरीत आहे. भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ३ गडी गमवत २७० धावा केल्या आणि १७१ धावांची आघाडी घेतली आहे. यात रोहित शर्माच्या तडाखेबंद शतकाने भारताच्या डावाला आकार दिला. त्याने मैदानावर इंग्लिश गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. यात इंग्लडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनही अपवाद नव्हता.
भारतीय फलंदाजांचा धडाधड पव्हेलियनला पाठवणाऱ्या अँडरसनला यावेळी रोहितची मात्र विकेट मिळत नव्हती. हे पाहून वैतागलेल्या अँडरसनने दरम्यान रागही व्यक्त केला.
दुसऱ्या डावात रोहित आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीलाच रोहितला जीवनदान मिळाल्याने इंग्लडचा संघ थोडा पिछाडीवर गेला होता. कारण त्यानंतर रोहितने खेळपट्टीवर चांगलाच जम बसवला आणि आपल्या खास शैलीत गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या डावाचे ३८ वे षटक अँडरसन टाकत होता. अँडरसनचे चेंडू स्विंग होतच नव्हते, त्यात रोहितने शेवटच्या चेंडूवर जबरदस्त कव्हर ड्राईव्ह मारला. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवायची संधीही मिळाली नाही. यामुळे संतापात येऊन त्याने जोरात खेळपट्टीवर लाथ मारून आपली निराशा व्यक्त केली.
https://twitter.com/SangemVishal/status/1434399228562837505?s=20
दरम्यान केएल राहुल आणि रोहित शर्माने दुसऱ्या डावात भक्कम सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी झाली. रोहितने शानदार १२७ धावांची खेळी केली तर राहुलने ४६ धावांचे योगदान दिले. पुजाराने ६१ धावा करून मोलाची साथ दिली. भारतीय संघाने ३ विकेट गमावून २७० धावा केल्या आहेत. विराट कोहली २२ तर रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहे. भारताकडे सध्या १७१ धावांची आघाडी आहे.
तत्पूर्वी, सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावात ९९ धावांची आघाडीही घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘वैयक्तिक कटुतेमुळे अश्विनला संघात स्थान दिले नाही’, कर्णधार कोहलीवर विरोधी संघातून जहरी टीका
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर केएल राहुलला आयसीसीने ठोठावला दंड, जाणून घ्या कारण
ओव्हलमध्ये ६१ धावांची उपयुक्त खेळी करुनही पुजारा नाखुश; म्हणाला, ‘पुढच्या सामन्यात शतक ठोकणार’






