ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात दोन्ही संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे. अशातच इंग्लंड संघासाठी आनंदाची व भारतीय संघासाठी काहीशी आव्हानात्मक बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाचा स्टार खेळाडू जॉनी बेयरस्टो भारताविरुद्ध शेवटच्या 3 सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
बेयरस्टोला पहिल्या 2 सामन्यांसाठी आराम देण्यात आलेला होता. मात्र आता इंग्लंड संघाने स्पष्ट केले आहे की बेयरस्टो शेवटच्या 3 सामन्यात खेळणार आहे. बेयरस्टोला आराम देण्याच्या निर्णयावरून अनेक माजी दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी इंग्लंड संघ व्यवस्थापनावर टीका केली होती.
श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज
बेयरस्टो सध्या शानदार फॉर्ममध्ये असून त्याने श्रीलंकाविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने 46.33च्या सरासरीने 139 धावांची कामगिरी केली होती. यासह तो श्रीलंकाविरुद्ध मालिकेत जो रूट नंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला होता. त्यामुळे बेयरस्टोचे संघात पुनरागमन झाल्यास इंग्लंड संघाला निश्चितच मजबुती मिळणार आहे.
चेन्नई कसोटीने होणार दौऱ्याची सुरुवात
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असणार आहे. भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“असेच चालू राहिले तर मानसिक दृष्ट्या आजारी होतील विराट, अजिंक्य, रोहितसारखे क्रिकेटर”
८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा, ‘हे’ आहे कारण
‘यॉर्कर किंग’ मिचेल स्टार्कचा आज वाढदिवस, जाणून घ्या त्याच्या कारकिर्दीतील माहिती नसणाऱ्या बाबी