येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. पहिल्यावाहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असून यासाठी त्यांनी जोरदार कंबर कसली आहे.
मात्र आता या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने एक अजब मागणी केली आहे. त्याने या अंतिम सामन्यात खेळपट्टीवर गवत फारसे नसावे, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी या ही मागणी करण्यामागचे कारणही त्याने उलगडले आहे.
‘या’ कारणासाठी केली मागणी
केन विलियम्सनने आयसीसीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. साउथम्पटनच्या खेळपट्टीबाबत बोलतांना त्याने यावर गवत कमी असावे, अशी मागणी केली. सध्या इंग्लंडमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचे कारण त्याने यासाठी दिले. विलियम्सन म्हणाला, “साउथम्पटनच्या खेळपट्टीवरील गवत हटवले गेले पाहिजे आणि खेळपट्टीला चांगल्या पद्धतीने रोल देखील करायला हवे. सध्या ज्या प्रमाणात पाऊस होतो आहे, ते पाहून क्युरेटरने हा निर्णय घ्यायला हवा. इथले वातावरण वेगळे आहे. आणि इथे ड्यूक चेंडूसमोर खेळणे, रोमांचकारी असेल.”
भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक
यावेळी केन विलियम्सनने भारतीय गोलंदाजांचे देखील भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, “भारतीय संघाकडे निश्चितच शानदार गोलंदाजी आक्रमण आहे. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणात तीच भेदकता आहे, जी काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणात दिसून येत असे. वेगवान गोलंदाजी असू देत किंवा फिरकी, दोन्ही विभागात भारतीय गोलंदाजांकडे वैविध्य आहे.”
सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत असून यातील पहिला सामना लॉर्डसच्या मैदानावर नुकताच पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला. आता दुसरा सामना १० जूनपासून बर्मिंगहॅम येथील एजबस्टनच्या मैदानावर खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपद फायनलपूर्वी भारतासाठी धोक्याची घंटा, ‘हा’ घातक किवी गोलंदाज करणार पुनरागमन
रॉस टेलरला बाद करण्यासाठी मार्क वूडने दाखवले त्याच्यातील फुटबॉल कौशल्य, पाहा व्हिडिओ
अखेर बीसीसीआयला आली जाग! वर्षभरानंतर महिला क्रिकेटपटूंना मिळाली ‘त्या’ स्पर्धेची बक्षीस रक्कम