महेंद्रसिंग धोनीला टी-२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्याच्या निर्णयामुळे दिग्गज खेळाडू आणि चाहते दोघेही आनंदी आहेत. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले की हा एक चांगला निर्णय आहे. भारतीय संघाला याचा फायदा होईल. ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थिती खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवेल.
कोलकाता येथील कार्यक्रमादरम्यान धोनीला मार्गदर्शक बनवल्याबद्दल कपिल देव म्हणाले की, ‘माझा नेहमीच विश्वास होता की, कोणताही खेळाडू निवृत्तीच्या ३-४ वर्षानंतरही संघाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जोडला गेला पाहिजे. कदाचित धोनीचे प्रकरण विशेष ठरेल, कारण त्याला निवृत्त होऊन फक्त एक वर्ष झाले आहे. सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचीही प्रकृती ठीक नाही. अशा परिस्थितीत धोनीला संघात सामील करण्याचा निर्णय ‘स्पेशल केस’ च्या अंतर्गत येऊ शकतो. मला वाटते की हा निर्णय विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन घेतला गेला आहे, जो उत्तम आहे.’
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सोडून करून केवळ १ वर्ष झाले आहे. असे असूनही बीसीसीआयने त्याला ही जबाबदारी सोपवली आहे. धोनी केवळ टी- २० विश्वचषकासाठी संघाचा मार्गदर्शक राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वत: विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करताना याची पुष्टी केली होती. ते म्हणाले, ‘मी दुबईला असताना धोनीशी बोललो होतो. त्याने केवळ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक होण्याचे मान्य केले होते. या विषयावर मी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशीही बोललो होतो. प्रत्येकाने धोनीला संघात समाविष्ट करण्यास सहमती दर्शवली. यामुळे आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचू शकलो.’
महत्त्वाच्या बातम्या –
असे ३ खेळाडू ज्यांना टी२० विश्वचषकांच्या सामन्यांत धोनी नक्की खेळवण्याचा प्रयत्न करेल
आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर ३ वेळा कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव, कुठे झाला निष्काळजीपणा?
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची मोठी ‘स्वप्नपूर्ती’; आई-वडिलांना पहिल्यांचा घडवला विमानप्रवास, पाहा फोटो






