पुणे। महाराष्ट्राच्या खेळाडूंची अन्य गटात पराभव सुरू असतानाच २१ वर्षाखालील मुलींमध्ये महाराष्ट्राने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी साखळी गटातील शेवटच्या लढतीत उत्तरप्रदेशचा ३८-२३ असा पराभव केला.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. पूर्वार्धात २०-१४ अशी महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. ही आघाडीच महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरली. महाराष्ट्राच्या सोनाली हेळवी व आसावरी खोचरे यांनी केलेल्या खोलवर चढायांपुढे उत्तरप्रदेशचा बचाव निष्प्रभ ठरला.
उत्तरप्रदेशकडून अमरीशकुमारी व शिवानी यांनी चढायांमध्ये काही गुण मिळविले मात्र महाराष्ट्राची आघाडी तोडणे त्यांना शक्य झाले नाही. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हिमाचल प्रदेशच्या आव्हानास तोंड द्याावे लागणार आहे. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत हरयाणापुढे आंध्रप्रदेशचे आव्हान असणार आहे.






