आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबला 192 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल पंजाबचा संघ 8 गडी गमावून केवळ 143 धावा करू शकला आणि सामना 48 धावांनी गमावला. पराभवानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल निराश होता.
या सामन्यात मुंबई संघाचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड याने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने 20 चेंडूत 47 धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने हार्दिक पंड्याचे कौतुक केले आहे.
सामना जिंकल्यानंतर पोलार्ड म्हणाला, “जिंकल्यानंतर आनंद झाला. मागील सामन्यात आमचा पराभव झाला होता. आज आम्हाला जिंकण्याची उत्तम संधी होती.”
हार्दिकचे कौतुक करताना पोलार्ड म्हणाला, “आज हार्दिक खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आला आणि त्याने आपली प्रतिभा दाखवली. शेवटच्या 4 षटकात प्रत्येकालाच मोठे फटके खेळावे लागतात. शारजाहचे मैदान लहान आहे. परंतु या मोठ्या मैदानात चौकार- षटकार मारणे कठीण होते. पुढे आम्हाला काही महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत, त्यासाठी आम्ही तयार आहोत.”
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल म्हणाला, “आम्हाला अतिरिक्त गोलंदाज खेळवावा लागेल. या पराभवानंतर मी निराश झालो आहे. आम्ही चार पैकी तीन सामने जिंकू शकलो असतो. आम्ही या सामन्यात काही चुका केल्या. आशा आहे की पुढील सामन्यांमध्ये आम्ही चांगले प्रदर्शन करू. अतिरिक्त गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू संघात असणे आवश्यक आहे. अष्टपैलू खेळाडू असल्यास तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो. प्रशिक्षकासोबत बोलून याबाबत निर्णय घेऊ.”