आयपीएलच्या या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबने सुरुवातिच्या काही सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही फलंदाजांनी या हंगामात शतक झळकावले आहे. मात्र या संघाने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात संघाला यश मिळाले आहे. पराभवामुळे खेळाडूंचे मनोबल खचले आहे. या लेखात आपण पंजाबच्या अपयशाचे एक मोठे कारण पाहाणार आहोत.
केएल राहुल आणि अगरवालने केली सर्वोत्कृष्ट कामगिरी, मात्र मॅक्सवेल फ्लॉप
कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची आकडेवारी पाहिल्यास असे दिसते की या संघात फक्त दोनच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कारण, आकडेवारीनुसार या दोघांनी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली पण संघाची कामगिरी कामगिरी निराशाजनक आहे. केएल राहुलने आतापर्यंत सात सामन्यांत 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 387 धावा केल्या आहेत. दुसरीकडे मयंक अगरवालने सात सामन्यांत 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या सहाय्याने 337 धावा केल्या आहेत. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त डावखुरा फलंदाज निकोलन पुराननेही चांगली कामगिरी केली आहे.
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडून चाहत्यांना प्रत्येक सामन्यात अपेक्षा असतात पण अर्धी स्पर्धा संपूनही त्याने काही खास कामगिरी केली नाही. मागील महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने ऑस्ट्रेलियाकडून शतक झळकावले होते. मात्र आयपीएलमध्ये हा फॉर्म कायम राखण्यात त्याला अपयश आले आहे.
गोलंदाजीतही सातत्य नाही
पंजाबच्या गोलंदाजांच्या कामगिरीतही सातत्य दिसलेले नाही. रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी यांची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी अन्य गोलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
संघाला सामूहिक प्रयत्न करण्यात आले अपयश
फक्त एक-दोन खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे कोणताही संघ प्रत्येक सामन्यात विजय मिळवू शकत नाही. किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही असेच घडत आहे. पंजाबमध्ये असलेल्या धडाकेबाज खेळाडूंमुळे संघ बळकट दिसत असला तरीही या संघाला सामूहिक प्रयत्न करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच या संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे.
रणनीती अमलात आणण्यात आले अपयश
सामना खेळताना खेळाडूंना रणनीती अंमलात आणण्यात अपयश आले आहे. सामना जिंकायचा असेल तर काही योजना करून त्या यशस्वीपणे अंमलात आणने गरजेचे आहे. जर एका सामन्यात सर्व अकरापैकी किमान सहा खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट असेल तर या संघाला विजयापासून कोणीच रोखू शकत नाही.
या संघाला पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळायचा आहे. बंगलोरने या हंगामात पाच सामने जिंकले आहेत. या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर पंजाबने जुन्या चुका दुरुस्त करून फक्त केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांच्यावरच अवलंबून राहू नये.