आयपीएल 2025 मध्ये सलग तिसऱ्या पराभवानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा घमंड तुटला आहे. गेल्या हंगामात फलंदाजीने कहर करणाऱ्या एसआरएच संघाने या हंगामातही अशाच प्रकारे सुरुवात केली, परंतु गेल्या तीन सामन्यांमध्ये त्यांचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. 300 धावा तर सोडाच, संघ 200 धावांचा टप्पाही गाठू शकलेला नाही. केकेआरविरुद्धच्या 80 धावांच्या मोठ्या पराभवानंतर, पॅट कमिन्सने पुढील सामन्यात बदलाचे संकेत दिले आहेत आणि ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात झालेल्या पराभवासाठी क्षेत्ररक्षकांना जबाबदार धरले आहे. हैदराबादने क्षेत्ररक्षणात खूप चुका केल्या, ज्यामुळे केकेआर 200 धावांचा टप्पा गाठू शकला. यानंतर त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली आणि संपूर्ण संघ 120 धावांवर ऑलआउट झाला.
सामन्यानंतर पॅट कमिन्स थोडा निराश दिसला, पण त्याचे विश्लेषण प्रामाणिक होते. तो म्हणाला, “खरं सांगायचे तर, हा आमच्यासाठी चांगला दिवस नव्हता. विकेट मस्त होती. (खेळण्यास योग्य आणि भरपूर धावांसाठी तयार). पण आमच्याकडून काही चुका झाल्या, विशेषतः क्षेत्ररक्षणात. शेवटी त्या चुकांचा परिणाम झाला आणि सामना हाताबाहेर गेला.”
तीन सलग पराभवांनंतर आत्मचिंतन गरजेचे असल्याचेही त्याने मान्य केले. “आता आपण वास्तवाकडे बघायला हवे. मागच्या काही सामन्यांमध्ये आमची रणनिती कामी आली नाही. कदाचित, काही निर्णय वेगळे घेतले असते तर चित्र वेगळे असले असते,” असं तो थेटपणे म्हणाला.
कमिन्सच्या मते, गोलंदाजी फारशी वाईट नव्हती, पण क्षेत्ररक्षणाने गडबड केली. “आम्हाला काही झेल टिपायला हवे होते, तिथेच सामन्याचा टर्निंग पॉईंट होता,” असे त्याने स्पष्ट केले.
शेवटी थोडा खोल विचार करत, कमिन्स म्हणाला, “हो, काही गोष्टी वेगळ्या करता आल्या असत्या. पण आता फार खोलात शिरायला नको. पुढचा सामना आता ओळखीच्या मैदानावर आहे. जिथे आमचा आत्मविश्वास थोडा जास्त असेल.”