सध्या भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १० गडी राखत झिम्बाब्वेवर एकहाती विजय मिळवला. आणि सध्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली. या विजयानंतरही भारतीय कर्णधार केएल राहुलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक, आशिया चषक २०२२च्या तयारीसाठी ही मालिका काही भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात होती, परंतु पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, संघ ही तयारी सोडून केवळ विजयाची नोंद करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. हरारे वनडेत प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते, ही धावसंख्या टीम इंडियाने ३०.५ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केली.
झिम्बाब्वे दौरा संघ आणि आशिया चषक संघावर एक नजर टाकली तर दोन्ही ठिकाणी तीन खेळाडू उपस्थित आहेत. यामध्ये कर्णधार केएल राहुलसह दीपक हुडा आणि आवेश खान यांचा समावेश आहे. केएल राहुल आयपीएल २०२२ पासून संघाबाहेर होता. झिम्बाब्वे दौऱ्यात तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. आशिया चषक स्पर्धेसाठी त्याच्याकडे तंदुरुस्ती आणि फलंदाजीची लय परत मिळवण्याच्या केवळ तीन संधी होत्या, ज्यामध्ये त्याने पहिली संधी गमावली आहे.
वास्तविक, झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली असती तर भारतीय खेळाडूंना भरपूर सरावाची संधी मिळाली असती, या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळणारा कर्णधार केएल राहुलही फलंदाजीत योगदान देऊ शकतो. त्याचवेळी आशिया चषक संघातील अन्य फलंदाज दीपक हुडा यालाही खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्याचवेळी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ १८९ धावांत गुंडाळला असताना राहुलने आपला निर्णय बदलला नाही. शिखर धवन आणि शुभमन गिल यांना सलामीला पाठवण्यात आले. आणि या दोन्ही खेळाडूंनी स्वबळावर सामना जिंकला. ही कमी धावसंख्या पाहिल्यानंतर राहुलला आपला निर्णय बदलता आला असता आणि त्याला सराव करता यावा म्हणून मधल्या फळीऐवजी डाव सुरू करता आला असता, पण त्याने तसे केले नाही.
याशिवाय केएल राहुलने आशिया चषक २०२२च्या संघाचा भाग असलेल्या आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या अनुपस्थितीत आगामी स्पर्धेत आवेशची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे त्याला झिम्बाब्वेमध्ये संधी मिळायला हवी होती, पण तसेही झाले नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आशिया चषक २०२२च्या संघात समाविष्ट केलेल्या तीन खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही. अशा स्थितीत या मोठ्या स्पर्धेसाठी अशी टीम इंडिया तयारी करू शकेल का हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
युझीपासून वेगळी झाली तरीही स्वबळावर राहू शकते, चहलच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी रंगलेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना