भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) कर्णधारपद सोडले आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान विराटने घोषणा केली होती की, तो पुढच्या वर्षी आरसीबीचे नेतृत्व करणार नाही. तो फलंदाजाच्या रुपात संघात सामील होईल. अशात पुढच्या वर्षी आरसीबीला एका नवीन कर्णधाराची आवश्यकता असणार आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज एस बद्रीनाथने आरसीबीचा नवीन कर्णधार कोण असेल, याविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे.
तत्पूर्वी आयपीएल २०२१ वेळी विराटने भारताच्या टी२० संघाचे आणि आरसीबीचे नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्याने सांगितल्याप्रमाणे, भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडले आहे. पुढच्या वर्षी तो आरसीबीचे देखील नेतृत्व करणार नाही. अशात विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर एबी डिविलियर्स आरसीबीचा नवीन कर्णधार असेल, अशी अनेकांना आशा होती. मात्र, डिविलियर्सने देखील क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आरसीबीच्या कर्णधारपदाबाबत पेच निर्माण झाला. अशात आता एस बद्रिनाथने पुढच्या हंगामात आरसीबीचा कर्णधार कोण असेल याची माहिती दिली.
आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आणि एमएस धोनीचा जुना सहकारी बद्रीनाथने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून आरसीबीच्या नवीन कर्णधाराविषयी मत मांडले आहे. एका नेटकऱ्याने बद्रीनाथला आरसीबीच्या नवीन कर्णधाराबाबत प्रश्न विचारला. बद्रीनाथने हे ट्वीट रिट्वीट करत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याच्या मते केएल राहुल आरसीबीचा नवीन कर्णधार असू शकतो.
दरम्यान, आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी केएल राहुलला पंजाब किंग्स संघ रिटेन करू इच्छित होता. मात्र, केएल राहुलने मात्र संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या हंगामात राहुल नवीन फ्रेंचायझीसोबत खेळताना दिसू शकतो. याच पार्श्वभूमीवर अशीही माहिती समोर आली आहे की, राहुल पुढच्या हंगामात सहभागी होणाऱ्या दुसऱ्या दोन नवीन फ्रेंचायझींपैकी एकाचे कर्णधारपद सांभाळू शकतो. राहुलने आयपीएलच्या मागच्या चार हंगामात एकदाही ५५० पेक्षा कमी धावा केलेल्या नाहीत. त्याचे हे प्रदर्शन पाहता पुढच्या हंगामात फ्रेंचायझी त्याला विकत घेण्यासाठी मोठी किंमत मोजतील अशी शक्यता आहे.