टी20 विश्वचषकाचा बिगुल वाजला आहे. मंगळवारी बीसीसीआयनं आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. निवडकर्ते अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीनं अनेक क्रिकेटपटूंच्या नावांवर विचारमंथन केलं. अखेर समितीने या 15 खेळाडूंना मान्यता दिली. मात्र, असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली, परंतु त्यांना संघात स्थान मिळालं नाही. चला तर मग, या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
केएल राहुल – गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात केएल राहुल टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य होता. राहुलनं संपूर्ण विश्वचषकात यष्टीरक्षकाची भूमिका बजावत चांगली फलंदाजी देखील केली होती. परंतु टी20 विश्वचषकासाठीच्या टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या ऐवजी रिषभ पंत आणि संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
राहुल आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व करत असून त्याची टीम सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. राहुलनं आयपीएल 2024 मध्ये बॅटनही कमाल केली असून आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 42च्या सरासरीनं 378 धावा केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचाही भारतीय संघात समावेश नाही. तो आयपीएलच्या या हंगामात तुफान फार्मात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 54 चेंडूत 98 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर निवड समिती गायकवाडला संधी देऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. परंतु तसं झालं नाही. आयपीएलच्या या हंगामात त्यानं एक शतकही ठोकलं आहे. ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 9 सामन्यांमध्ये 447 धावा ठोकल्या आहेत.
मयंक यादव – आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवची सध्या खूप चर्चा होत आहे. 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा मयंक काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे अनफिट झाला होता. जरी तो आता तंदुरुस्त झाला असला, तरी त्याची टी-20 विश्वचषक संघात निवड झालेली नाही. त्यानं आयपीएलमध्ये 2 सामने खेळले, ज्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यानं सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
रवी बिष्णोई – टीम इंडियाचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईच्या नावाचीही खूप चर्चा होत होती. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. तो उत्कृष्ट गोलंदाजासह चपळ क्षेत्ररक्षकही आहे. मात्र, आयपीएलच्या या हंगामात त्याच्या गोलंदाजीची धार थोडी कमी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याचं वर्ल्डकपचं तिकीट हुकल्याचं बोललं जातंय. रवी बिश्नोईनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांत केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कमबॅक असावा तर असा! 17 महिन्यांनंतर मैदानावर परतताच रिषभ पंतला थेट वर्ल्ड कपमध्ये संधी!
टी20 वर्ल्डकपसाठी ‘कुलचा’ संघात परतले, बुमराह-अर्शदीप-सिराज यांच्याकडे वेगवान माऱ्याची धूरा