रविवारी (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमसच्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवला. यासोबतच भारताने ही मालिका 2-0ने खिशात घातली. भारताने दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवत बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना न हारण्याचा विक्रम कायम ठेवला. विशेष म्हणजे, रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या केएल राहुल याने मालिका विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राहुलने स्पष्टपणे ड्रेसिंग रूममधील परिस्थिती सांगितली आहे.
काय म्हणाला राहुल?
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती होती, याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “तुम्ही मधल्या फळीतील खेळाडूंवर विश्वास ठेवता. कुणीतरी सामना जिंकून देण्यासाठी हातभार लावेल, हे जाणून घेण्यासाठी आम्ही तेवढे क्रिकेट खेळलो आहोत. मात्र, मी खोटे बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये खूपच तणाव होता. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूपच कठीण होती. त्यांनी दोन्ही डावांमध्ये आमच्यावर दबाव टाकला. खरं तर, ही खेळपट्टी नवीन चेंडूसाठी पूरक होती. मात्र, जेव्हा चेंडू जुना झाला, तेव्हा धावा करणे सोपे झाले होते.”
https://twitter.com/BCCI/status/1606923231843487744
तो पुढे म्हणाला की, “हा विषय असा होता की, कुणीतरी नवीन चेंडूही चांगल्या पद्धतीने खेळत आहे. आम्ही आव्हानाचा पाठलाग करत जास्त विकेट्स गमावल्या. मात्र, आम्ही आमचे काम पूर्ण केले. मागील काही वर्षांपासून आतापर्यंत गोलंदाजी आक्रमण एकसारखेच राहिले आहे. मागील काही वर्षात आम्ही जिथेही परदेशात गेलो, तिथे आम्ही आमचे काम पूर्ण केले आहे.”
मालिकेत फ्लॉप ठरला राहुल
या संपूर्ण मालिकेत केएल राहुल फलंदाजीत फ्लॉप ठरला. त्याने 2 सामन्यातील एकूण 4 डावात 57 धावा चोपल्या. कर्णधार म्हणून त्याची ही कामगिरी खूपच चिंताजनक आहे. त्याने फक्त या मालिकेतच नाही, तर या वर्षात कसोटीत फक्त 17.12च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. राहुलने यावर्षी एकूण 4 सामने खेळताना 8 डावांमध्ये 137 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला फक्त एक अर्धशतक करण्यात यश आले आहे. (KL rahul talked about dressing room tension after won the series against bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलला तोडावी लागली धोनीची परंपरा, मालिका विजयानंतर ‘या’ खेळाडूच्या हातात सोपवली ट्रॉफी
अश्विन-श्रेयसच्या भन्नाट खेळीने भारताचा दुसऱ्या कसोटीत रोमांचक विजय, मालिकाही घातली खिशात






