क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या भविष्यातील कमाईसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करतो. कोणी प्रशिक्षक, समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडून राहतो. काहीजण स्वत: चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात किंवा इतर कोणत्यातरी क्षेत्रात गुंतवणूक करून, उद्योगपती म्हणून नाव कमावतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू देखील झाले आहेत, ज्यांनी क्रिकेट सोडल्यानंतर इतर खेळांमध्ये हात आजमावले. भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे व्यवसायिक गोल्फपटू बनले होते. तर, इंग्लंडचा माजी अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफ याने व्यवसायिक मुष्टियोद्धा होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय संघाचा एक खेळाडू असा आहे, जो निवृत्तीनंतर चित्रपट अभिनेता बनला. काही वर्ष भारतीय संघाचा प्रमुख सलामीवीर राहिलेला व नंतर दक्षिणात्य चित्रपटांचा नायक झालेला हा फलंदाज आहे, सदागोपन रमेश.
आळसामुळे बनले फिरकीपटू
वयाच्या दहाव्या वर्षी रमेश यांनी टेनिस बॉलसह क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते मध्यमगती वेगवान गोलंदाज म्हणून तेरा वर्षाखालील संघात खेळत. १५ वर्षाखालील संघाच्या निवड चाचणीमध्ये ते बळी मिळवू शकले नाहीत. परिणामी, त्यांची संघात निवड होऊ शकली नाही. एका मुलाखतीत आपल्या लहानपणीच्या किस्स्यांविषयी सांगताना रमेश म्हणाले होते की,
” मी वेगवान गोलंदाजी सोडण्याचे कारण म्हणजे आळस. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी, खूप धावावे लागायचे आणि मला याचा खूप कंटाळा येत. सोबतच, वेगवान गोलंदाजी करताना, ऊर्जा देखील अधिक खर्च होत. मी जवळपास क्रिकेट सोडण्याच्या विचारात होतो. तेव्हा माझ्या भावाने मला सांगितले, क्रिकेट सोडण्यापेक्षा तू फिरकी गोलंदाजी कर. त्याच्या सांगण्यावरून, मी ऑफस्पिन गोलंदाजी करू लागलो. आश्चर्य म्हणजे, मला सोळा वर्षाखालील संघात फिरकीपटू म्हणून जागा मिळाली.”
नशिबाने मिळाली सलामीवीराची जागा
सोळा वर्षाखालील संघात ते, आठव्या किंवा नवव्या स्थानावर फलंदाजी करत. मात्र, एका सामन्यावेळी संघाचा सलामीवीर जखमी झाला आणि रमेश यांना डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्या सामन्यात अशी काही फलंदाजी केली की, ते कायमस्वरूपी सलामीवीर बनले.
रमेश यांनी हैदराबादविरुद्ध डिसेंबर १९९५ मध्ये प्रथमश्रेणी पदार्पण केले. पहिल्या डावात त्यांनी ५९ आणि दुसऱ्या डावात १३२ धावा फटकावल्या. प्रथमश्रेणी पदार्पणाच्या काही दिवसानंतर त्यांनी पहिला लिस्ट ए सामना खेळला. मात्र, यात ते फक्त १८ धावा बनवू शकले. १९९८-९९ मध्ये रमेश यांचा घरगुती हंगाम चांगला गेला. रणजी ट्रॉफीत त्यांची सरासरी ५२ हून अधिक राहिलेली. नवज्योतसिंह सिद्धू यांच्या निवृत्तीमूळे, रमेश यांची भारतीय संघात निवड होण्यासाठी अडचण आली नाही.
स्वप्नवत आंतरराष्ट्रीय पदार्पण
जानेवारी १९९९ मध्ये चेन्नई येथील आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करताना, त्यांनी प्रशंसनीय कामगिरी करत, क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. वसीम अक्रम आणि वकार युनुस यांच्यासारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांनाविरुद्ध तो फार काळ टिकणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र, रमेश यांनी सर्वांचे अंदाज चुकवत ४१ चेंडूंत ४३ धावा केल्या. रमेश पहिल्या दिवशी जेव्हा, ३० धावांवर नाबाद राहत ड्रेसिंग रूम मध्ये दाखल झाले, तेव्हा भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी त्यांना मिठी मारत, कौतुक करताना म्हटले,
“मी यापूर्वी कोणत्याही तरुण खेळाडूला वसीम व वकारविरुद्ध इतक्या आत्मविश्वासाने खेळताना पाहिले नाही.”
त्याचवेळी अझरुद्दीन यांनी रमेश यांना एक बूट जोडी बक्षीस म्हणून दिली होती. कसोटीमधील शानदार कामगिरीच्या जोरावर, त्यांना लगेचच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवडले गेले. पहिल्या सामन्यात सौरव गांगुलीसोबत त्यांनी सलामी देत, २४ धावा काढल्या.
१९९९ रमेश यांचे वर्ष होते
अवघ्या चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झालेल्या, रमेश यांना १९९९ विश्वचषकाच्या संघात निवडले गेले. भारतासाठी विश्वचषक खेळण्याचे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण झाले. त्यांनी स्पर्धेत ५ सामने खेळताना, २८.८० च्या सरासरीने १४४ धावा जमविल्या. १९९९ या संपूर्ण वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांना १९९९ चा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून नावाजले गेले. त्यानंतरचा, ऑस्ट्रेलिया दौरा त्यांच्यासाठी अत्यंत वाईट ठरला. कसोटी मालिकेत ३ सामने खेळताना ते अवघ्या ६० धावा काढू शकले. भारतीय संघाने ही मालिका ३-० अशा फरकाने गमावली.
सौरव गांगुली प्रथमच कर्णधार बनलेल्या, १९९९ च्या कोकाकोला कपमध्ये त्यांनी गोलंदाज म्हणून एक विक्रम केला. वेगवान गोलंदाजांना बळी मिळत नसल्याने, गांगुलीने रमेश यांना गोलंदाजी करण्यास सांगितले. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी न केलेल्या रमेश यांनी पहिल्याच चेंडूवर निक्सन मॅक्लीन यांना बाद केले. याच बरोबर, पहिल्या चेंडूवर बळी मिळवणारे ते पहिले भारतीय गोलंदाज ठरले.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षणांचे साक्षीदार
अनिल कुंबळेने एका डावात घेतलेल्या १० बळींच्या सामन्यात रमेश यांनी फलंदाजीत उपयुक्त योगदान दिले होते. २००१ च्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स कसोटीत हरभजन सिंगची हॅट्रिक पूर्ण करतानाचा झेल रमेश यांनी टिपला होता. भारतीय क्रिकेटच्या अनेक अमूल्य क्षणांचे ते साक्षीदार राहिले आहेत.
चांगली गुणवत्ता असतानाही रमेश भारतासाठी जास्त काळ खेळू शकले नाहीत. रमेश यांनी २००१ मध्ये श्रीलंकेमध्ये अखेरची कसोटी खेळली. भारताने ही मालिका २-१ ने गमावली होती. पण, रमेश या दौर्यामध्ये दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक धावा काढणारे भारतीय फलंदाज होते. त्यांनी ३७.१६ च्या सरासरीने २२३ धावा करताना, तीन ४० पेक्षा जास्त धावांच्या खेळ्या तर एक अर्धशतक झळकावले होते. मात्र, रमेश यांना त्यानंतर कधीही भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.
आपल्या तीन वर्षाच्या छोट्याशा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्यांनी १८ कसोटी व २४ एकदिवसीय सामने खेळले. यात त्यांनी, अनुक्रमे १,३६७ आणि ६४६ धावा काढल्या. त्यांच्या नावे दोन कसोटी शतके देखील जमा आहेत.
‘फिल्मस्टार’ रमेश
रमेश यांना अजूनही वाटते की, ते भारतासाठी कमीत कमी ५० कसोटी खेळायला पाहिजे होते. २००७ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी, तमिळ चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. २००८ त्यांचा पहिला चित्रपट ‘संतोष सुब्रमण्यम’ प्रदर्शित झाला. त्यानंतर पुन्हा, पोट्टापोट्टी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली. २०१९ मध्ये ‘स्वरस म्युझिक’ या कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली आहे.
सुरुवातीला दमदार प्रदर्शन केल्यानंतर, एका मालिकेत अपयशी ठरल्याने, ज्या खेळाडूंना वगळले व दुसरी संधी दिली नाही, अशा कमनशिबी खेळाडूंमध्ये रमेश यांचे नाव आजही शीर्षावर आहे.
वाचा – ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची परंपरा पुढे नेणारा नॅथन कुल्टर-नाईल