---Advertisement---

धोनी-केदारच्या धीम्या खेळीचा विराट-रोहितने केला बचाव

On: सोमवार, जुलै 1, 2019 4:11 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात रविवारी(30 जून) एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात 38 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला. हा भारताचा या विश्वचषकातील पहिलाच पराभव आहे.

या सामन्यात भारताला शेवटच्या 5 षटकात 71 धावांची गरज होती. यावेळी भारताकडून एमएस धोनी आणि केदार जाधव फलंदाजी करत होते. या दोघांकडूनही त्यावेळी मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. पंरंतू या दोघांना शेवटच्या 5 षटकात केवळ 39 धावा करता आल्या. त्यामुळे या दोघांवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली.

मात्र सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने या दोघांचाही बचाव केला आहे.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘जेव्हा धोनी आणि केदार फलंदाजी करत होते. तेव्हा ते बाऊंड्री मारण्याचा प्रयत्न करत होते. पण खेळपट्टी धीमी असल्याने त्यांना तसे करता येत नव्हते. शेवटी शेवटी खेळपट्टी धीमी झाली होती.’

‘आपल्याला इंग्लंडच्या संघालाही श्रेय द्यायला हवे. त्यांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. त्यांनी त्यांच्या विविधतेचे चांगले मिश्रण केले आणि आम्हाला संपूर्ण सामन्यात फक्त अंदाजच लावावा लागला.’

धोनीने या सामन्यात 31 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच केदारने 1 चौकारासह 13 चेंडूत 12 धावांची खेळी केली.

याआधीही अफगाणिस्तान विरुद्ध धोनी आणि केदारवर धीम्या गतीने केलेल्या खेळीमुळे टीका झाली होती. त्यावेळीही कर्णधार विराटने धोनीला पाठिंबा दिला होता. यावेळीही इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतरही विराटने धोनी आणि केदारचा बचाव केला आहे.

विराट म्हणाला, ‘मला वाटतं धोनी बाऊंड्री मारण्याचा खूप प्रयत्न करत होता. पण इंग्लंडचे गोलंदाज योग्य जागेवर गोलंदाजी करत होते. आम्ही आता बसून मुल्यांकन करु आणि पुढील सामन्यात सुधारणा करु.’

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 111 धावांची शतकी खेळी केली. तर जेसन रॉयने 66 आणि बेन स्टोक्सने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

तसेच नंतर 338 धावांचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने 102 धावांची शतकी खेळी केली. विराट कोहलीने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिक पंड्याने 45 धावांची खेळी केली. परंतू भारताला विजय मिळवून देण्यात यांना अपयश आले. इंग्लंडकडून लियाम प्लंकेटने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताला मोठा धक्का; शिखर पाठोपाठ विजय शंकरही पडला विश्वचषकातून बाहेर!

रिषभ पंतबद्दलच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे मजेशीर उत्तर, पहा व्हिडिओ

इंग्लंड विरुद्ध शतक करत रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment