भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव याचा जवळजवळ 5 दिवसांचा संघर्षपूर्ण कालावधी अखेरीस श्रीलंकेविरुद्धचा पहिल्या एकदिवसीय सामन्यातून संपला. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्सने कुलदीपच्या षटकात बक्कळ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. इतकेच नव्हे तर आयपीएलमध्येही त्याच्या फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला सामना खेळण्याच्या संधीच दिल्या नाहीत.
परंतु श्रीलंकेविरुद्ध कुलदीपने गोलंदाजी करत 48 धावा देत 2 गडी बाद केले. त्याचबरोबर संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले.
या कामगिरीच्या जोरावर त्याने हे सिद्ध केले की, अजूनही त्याची कारकीर्द संपलेली नाही. परंतु इतक्या दिवसांच्या अंतराने पुनरागमन करत असल्यामुळे तो थोडा नर्वस झाला होता. परंतु श्रीलंका दौर्यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला पाठिंबा दिला आणि कुलदीपने उत्कृष्ट कामगिरी देखील केली.
कुलदीप यादव सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला की, “जेव्हा तुम्ही खूप दिवसांनी खेळता तेव्हा तुम्ही नक्कीच नर्वस होता. पण तुमच्या मनात चांगली कामगिरी करण्याची आस असते. मलाही असेच झाले होते. सुरुवातीला मी राहुल द्रविड सरांशी बराच वेळ बोललो. त्यांनी मला साथ दिली आणि मला प्रेरणा दिली. तसेच मला गोलंदाजीचा आनंद घे असे सांगितले. त्यांनी मला त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला सांगितले, जे मी मागील 15 दिवसांपासून अजूनही करत आहे. त्याचबरोबर याचा काय परिमाण निघेल यावर विचार न करण्याचा सल्ला दिला. मी खूप आनंदी आहे की, मी या सामन्यात चांगली कामगिरी करू शकलो.”
त्याचबरोबर कुलदीप यादवला युजवेंद्र चहल आणि त्यांच्या जोडीबद्दल विचारले असता म्हणाला की, “पुन्हा एकत्र खेळून मला खूप आनंद झाला. कदाचित आम्ही एकमेकांना सोयीस्कर आहोत आणि एकमेकांना पाठिंबा देत आहोत. यामुळेच आम्हाला मदत होत आहे. आम्ही फील्ड सेटिंग दरम्यान एकमेकांना सल्ला देतो. मी आमच्या कामगिरीवर खूप खूष आहे.”
भारतीय संघाची फिरकीपटूची जोडी ‘कुलचा’ म्हणजेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल, श्रीलंकेविरुद्ध 2 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा एकत्र खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने 19 षटके एकत्र केली. कुलदीप यादवने 9 षटकांत 48 धावा देऊन 2 बळी घेतले; तर युजवेंद्र चहलने 10 षटकांत 52 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. म्हणजेच दोघांनी 19 षटकात 100 धावा दिल्या आणि श्रीलंकेच्या एकूण 4 फलंदाजांना बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या
बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया–
हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर ‘कोच’ द्रविडने दिली होती का काही प्रतिक्रिया? पृथ्वी शॉने केला खुलासा
दुसऱ्या सामन्यात आणखी तयारीनिशी उतरणार भारतीय संघ, रणतुंगा यांना देणार चोख प्रत्युत्तर