खेळातील कोणतीही विशेष घटना घडल्यास, तो दिवस नेहमीच लक्षात ठेवला जातो. त्यातील काही घटना ऐतिहासिक असतात, काही मोठे विक्रम झाल्याच्या असतात, काही खेळाडूंचा जन्मदिवस असतो. असाच क्रिकेटमध्ये ११ ऑगस्ट या दिवशीही वेगवेगळ्या वर्षी काही विशेष गोष्टी घडल्या, ज्यामुळे हा दिवस खास ठरला.
२००५
शेन वॉर्न याने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी मिळवत इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो त्यावेळी पहिला गोलंदाज होता. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर त्याने हे काम केले. १९९३ मध्ये माइक गेटिंगला बाद करण्यासाठी त्याने ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ सुद्धा याच मैदानावर टाकला होता.
वॉर्नने टाकलेला चेंडू इंग्लंडचा फलंदाज मार्कस ट्रेस्कॉथिक याने स्विप करण्याचा प्रयत्न केला, आणि बॅटची कड घेऊन उडायला चेंडू यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्टने झेलत वॉर्नच्या खात्यात ६०० वी विकेट जमा केली. याच झेलासोबत, ॲडम गिलख्रिस्टने देखील, कसोटी क्रिकेटमध्ये आपले ३०० झेल पूर्ण केले.
१९७७
इंग्लिश क्रिकेटमधील सर्वाधिक उत्साही दिवसांपैकी एक दिवस, जेफ्री बाॅयकॉट यांच्या शंभरव्या प्रथमश्रेणी शतकाने पूर्ण झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात आपले घरगुती मैदान असलेल्या हेडिंग्लेवर त्यांनी ही कामगिरी केली. प्रथमश्रेणी सामन्यांत १०० शतके बनविणारे ते पहिले खेळाडू होत. बॉयकॉट यांनी त्या डावात १९१ धावा केल्या. तो सामना जिंकत, इंग्लंडने अॅशेस पुन्हा मिळवली होती.
१९६५
ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट कर्णधार आणि खेळाच्या उत्तम राजदूतांपैकी असलेले बिल वूडफुल यांचा मृत्यु. १९३२-३३ च्या कुप्रसिद्ध बॉडीलाईन मालिकेवेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे धीरोदात्तपणे नेतृत्व केले होते. त्या मालिकेच्या, ॲडलेड कसोटी दरम्यान इंग्लंडच्या हेरॉल्ड लार्वूड यांनी अनेक चेंडू वूडफुल यांच्या शरीरावर फेकल्यानंतर ही त्यांनी त्याचा धाडसाने सामना केला होता.
वूडफुल यांनी १९३०-१९३४ यादरम्यान ऑस्ट्रेलियाची नेतृत्व करत दरवेळी ऍशेस ऑस्ट्रेलियाकडेच ठेवण्यात यश मिळवले.
१९०९
आजच्याच दिवशी, ऑस्ट्रेलियाच्या वॉरेन बर्डस्ले यांनी कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. ओव्हलमधील ही कसोटी बरोबरीत सोडवत, ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ अशी जिंकली. आपल्या पिढीतील एक महान फलंदाज असलेल्या बर्डस्ले यांना इंग्लंडविरुद्धच्या पुढील शतकासाठी मात्र, १७ वर्षे वाट पाहावी लागली.
१९७४
२००० महिला क्रिकेट विश्वचषकात भारताची कर्णधार असलेल्या अंजू जैन यांचा जन्म. सलामीवीर यष्टीरक्षक आणि कर्णधार अशी तिहेरी भूमिका बजावत त्यांनी भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले. २००५ च्या विश्वचषकात देखील त्यांचा समावेश होता. या विश्वचषकात भारत उपविजेता राहिला. निवृत्तीनंतर, अंजू जैन यांनी भारतीय महिला क्रिकेट निवडसमितीच्या सदस्या म्हणून देखील काम पाहिले.
ट्रेंडिंग लेख-
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’
‘या’ कारणामुळे ११ वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस
रक्षाबंधन विशेष: पाच भारतीय दिग्गज क्रिकेटपटू आणि त्यांचे फारसे माहित नसलेले भाऊ-बहिण