आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत विक्रमी सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब नावावर केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने शतक ठोकले. हेड सोबतच शानदार भागीदारी करणाऱ्या मार्नस लॅब्युशेन याने आता या अंतिम सामन्यातील महत्त्वाच्या क्षणाविषयी खुलासा केला आहे.
या अति महत्त्वाच्या सामन्यात अनेक असे क्षण आले ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर दबाव बनवला. त्याविषयी बोलताना लॅब्युशेन म्हणाला,
“विराट कोहलीची विकेट ही माझ्यासाठी मोठा क्षण ठरली. विराट बाद झाला तेव्हा एक लाख 30 हजार लोक अचानक शांत झाले. या शांत मैदानात केवळ आमचा संघ एकत्रित आला होता व आमचाच आवाज येत होता. ही खरंच वेगळी अनुभूती होती.”
विराटने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याचा बळी मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय फलंदाजांवर दबाव आणून त्यांना केवळ 240 धावांवर रोखले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना फक्त 240 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांनी अर्धशतकी खेळी केली होती. यावेळी स्टार्कने 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेविस हेडने शतक ठोकले. त्याने 120 चेंडूत 137 धावा केल्या. त्याने मार्नस लॅब्युशेन याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 192 धावांची शानदार भागीदारी रचली. लॅब्युशेन अखेरपर्यंत नाबाद राहत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार बनला.
(Marnus Labuchagne Speaks About Best Moment In ODI World Cup Final)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…