ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाकडून 5 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला (T20 series IND vs AUS). स्कोअरबोर्डवर तब्बल 186 धावा उभ्या केल्या असूनही कांगारू गोलंदाज हे लक्ष्य वाचवण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाकडून टिम डेविडने आक्रमक फलंदाजी करत 38 चेंडूत 74 धावा केल्या, तर स्टॉइनिसने 64 धावा ठोकल्या.
पण गोलंदाजांचा खेळ मात्र अत्यंत निराशाजनक ठरला. कर्णधार मिचेल मार्शही संघाच्या कामगिरीवर नाराज दिसला. पराभवानंतर त्याने फलंदाजांनाच जबाबदार धरले.
तिसऱ्या टी-20 मध्ये पराभवानंतर मार्श म्हणाला, होय, आम्ही सुमारे 20 धावा कमी केल्या. याचं श्रेय भारतीय संघाला द्यावं लागेल. त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आम्ही फील्डिंगमध्ये पूर्ण प्रयत्न केला, पण आज भारत खऱ्या अर्थाने विजयाचा हकदार होता. सामना जिंकण्यासाठी आम्हाला आणखी 20 धावा हव्या होत्या. मला आमच्या फलंदाजांचा आत्मविश्वास आणि दृष्टिकोन आवडला, विशेषतः टिम डेविडचा. तो लवकर विकेट्स पडल्यावर मैदानात आला आणि अप्रतिम खेळला. स्टॉइनिसनेही शेवटीआपला अनुभव वापरत उत्कृष्ट खेळ केला. टी-20 मध्ये एक-दोन खराब षटके पूर्ण सामना बदलू शकतात.
मार्शने ग्लेन मॅक्सवेलच्या दुखापतीबद्दलही माहिती दिली. तो म्हणाला, मॅक्सवेल आज खेळणारच होता, पण तो पूर्णपणे तयार नव्हता. आम्हाला आशा आहे की पुढच्या सामन्यापर्यंत तो फिट होईल आणि चौथ्या टी-20 मध्ये खेळताना दिसेल. तो खूप अनुभवी टी-20 खेळाडू आहे आणि आम्हाला तो पुन्हा संघात पाहायला नक्कीच आवडेल.
होबार्टच्या मैदानावर टीम इंडिया ही ऑस्ट्रेलियाला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हरवणारी जगातील पहिली टीम ठरली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला या मैदानावर कधीच टी-20 मध्ये पराभव पत्करावा लागला नव्हता. या विजयानंतर भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. मालिकेचा चौथा टी-20 सामना आता 6 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.






