भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून उभय संघात मंगळवारी (२१ सप्टेंबर) मकॉय स्टेडियमवर पहिला वनडे सामना पार पडला. यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली अन् आपला हा निर्णय योग्य सिद्ध करत पाहुण्यांना सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. मात्र भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने ‘कॅप्टन्सी इनिंग’ खेळत संघाचा डाव २०० धावांपर्यंत पोहोचवला. या खेळीसह तिने मोठा किर्तीमानही केला आहे.
अवघ्या ३८ धावांवर संघाचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर मिताली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. तिने १०७ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी खेळली. ९२ व्या चेंडूवरच तिने आपले अर्धशतक पूर्ण करत मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या अर्धशतकासह तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट) २० हजार धावांचा आकडा पार केला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
https://twitter.com/BCCIWomen/status/1440130787219677195?s=20
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धचे अर्धशतक हे तिच्या वनडे कारकिर्दीतील सलग पाचवे अर्धशतक होते. मागील ४ वनडे सामन्यांमध्ये तिने अनुक्रमे नाबाद ७५ धावा, ५९ धावा, ७२ धावा आणि ७९ धावा फटकावल्या आहेत. इतकेच नव्हे तर, हे मितालीचे वनडेतील तब्बल ५९ वे अर्धशतक होते.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, मितालीला वगळता भारतीय संघाची एकही फलंदाज साजेशी खेळी करू शकली नाही. सलामीवीर शेफाली वर्मा ८ धावा तर स्म्रीती मंधाना १६ धावा करुन बाद झाली. त्यानंतर यक्षिका भाटियाने मितालीसोबत मिळून जवळपास १०० धावांची भागिदारी केली. मात्र तिही वैयक्तिक ३५ धावा करत झेलबाद झाली. पुढे पूजा वस्त्राकार आणि रिचा घोष यांनी जेमतेम २ आकडी धावा करत संघाचा धावफलक हालता ठेवला.
महत्त्वाच्या बातम्या-
बंगळूरूला चारीमुंड्या चीत करत कोलकाताने नोंदवला आयपीएलच्या इतिहासातील मोठा ‘सांघिक रेकाॅर्ड’





