पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी (1 ऑक्टोबर) रात्री त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. बाबर आझमनं सांगितलं की, त्याच्यावर कामाचा ताण खूप वाढला आहे आणि त्यामुळेच आता त्याला कर्णधार बनायचं नाही. बाबर आझम याच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानचा पुढील कर्णधार कोण होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
बाबर आझमबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तानला त्याच्या नेतृत्वाखाली भारतात झालेल्या विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला, ज्यानंतर त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर शाहीन आफ्रिदीला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. मात्र बोर्डानं टी20 विश्वचषकापूर्वी शाहीन आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवून बाबर आझमला पुन्हा एकदा कर्णधार बनवलं. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकात पाकिस्तानचा पुन्हा एकदा दारुण पराभव झाला. यामुळे आता बाबर आझमनं कर्णधारपद सोडलं.
बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर आता त्याच्या जागी कर्णधार कोण बनू शकतो, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद रिझवान या रेसमध्ये आघाडीवर आहे. रिझवानबद्दल आधीच बोललं जात होतं की तो पाकिस्तान संघाचा कर्णधार बनू शकतो. आता बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनवलं जाऊ शकतं. पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’नुसार, मोहम्मद रिझवान पाकिस्तान संघाचा पुढील कर्णधार बनू शकतो. याबाबत त्याच्याशी चर्चा होऊ शकते.
पाकिस्तानला पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायचं आहे. त्यापूर्वी बाबर आझमचं कर्णधारपद सोडणं हा संघासाठी मोठा धक्का मानला जातोय. मात्र, बाबर आझमनं संघाचं कर्णधारपद सोडावं, असे काही माजी क्रिकेटपटूंचं मत होतं. आता त्याच्यानंतर कोण कर्णधार बनतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
सरफराज थांबायचं नाव घेईना! इराणी चषकात ठोकलं तुफानी द्विशतक
“केएल राहुल लिलावात गेला तर त्याला इतके कोटी मिळतील”, आकाश चोप्राचा लखनऊला इशारा
शतक थोडक्यात हुकलं, पण संघासाठी संकटमोचक बनून आला अजिंक्य रहाणे!