विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबईच्या संघाने संपूर्ण हंगामातील आपले सातत्य कायम ठेवत तसेच लाजवाब प्रदर्शन केले. त्यांनी उत्तर प्रदेशच्या संघाचा ६ गडी राखून पराभव केला आणि विजय हजारे ट्रॉफीवर यंदा आपले नाव कोरले.
हंगामाच्या सुरुवातीला अनुभवी खेळाडूंसह उतरलेल्या मुंबईला उत्तरार्धात मात्र त्यांच्याविना खेळावे लागले. सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे भारताकडून खेळण्यासाठी रवाना झाल्याने युवा पृथ्वी शाॅच्या खांद्यावर मुंबईच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली होती. पृथ्वीने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत मुंबईला हे विजेतेपद जिंकवून दिले.
मुंबईसमोर होते विशाल लक्ष्य
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या होत्या. त्यामुळे ३१३ धावांचे विशाल आव्हान मुंबईला पार करावयाचे होते. पण सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी ते सहजसाध्य केले. मुंबईच्या या विजयात युवा कर्णधार पृथ्वी शाॅचे महत्वाचे योगदान राहिले. उत्तर प्रदेशने दिलेल्या ३१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीने ३९ चेंडूत ७३ धावांची आक्रमक खेळी करत मुंबईच्या विजयाची पायाभरणी केली.
त्यांनतर आदित्य तरेने नाबाद शतक झळकवत मुंबईचा विजय सुकर केला. तरेने १०७ चेंडूत ११८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला यशस्वी जयस्वालने २९, शम्स मुलानीने ३६ तर शिवम दुबेने ४२ धावांची खेळी करत सुयोग्य साथ दिली. फलंदाजांच्या या सांघिक योगदानामुळे मुंबईने अवघ्या ४१.३ षटकातच निर्धारित लक्ष्य गाठत आपला विजय सुनिश्चित केला.
माधव कौशिकचे शतक व्यर्थ
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तर प्रदेशने सलामीवीर माधव कौशिकच्या शतकाच्या बळावर ३०० धावांचा आकडा पार केला. माधव कौशिकने १५६ चेंडूत नाबाद १५८ धावांची खेळी साकारली. त्याला समर्थ सिंगने ५५ तर अक्षदीप नाथने देखील ५५ धावांची खेळी करत साथ दिली. मुंबईकडून तनुष कोटियनने १० षटकात ५४ धावा देत सर्वाधिक २ बळी मिळवले.
महत्वाच्या बातम्या:
पृथ्वीने गाजवले मैदान! दुखापतीनंतरही तुफानी अर्धशतक ठोकत केला विश्वविक्रम
मुंबईविरुद्ध १५८ धावांची खेळी केलेल्या माधव कौशिकने एक-दोन नव्हे तब्बल ५ विक्रमांना घातली गवसणी
IND vs SA : पूनम राऊतचे शतक व्यर्थ, चौथ्या सामन्यासह भारताने मालिकाही गमावली