मुंबई। मुंबई उपनगर कबड्डी असो. विद्यमाने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळाने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबचा चुरशीच्या लढतीत ३०-२८ असा पराभव करीत सलग तिसऱ्या वर्षी या विजेतेपदावर आपले नाव कोरले. पण कुमारी गटात मात्र महात्मा गांधी स्पोर्ट्सने संघर्ष क्रीडा मंडळावर ३७-१२ असा सरळ विजय मिळविला.
यामुळे दोन्ही संघाना संमिश्र विजेतेपदावर समाधान मानावे लागले. नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळाने पहिल्या डावातील १२-१७ अशा पिछाडीवरून २गुणांनी बाजी पलटविली हॅट्रिक साजरी केली. सायली जाधव, तेजस्वीनी पाटेकर यांनी चतुरस्त्र खेळ करीत महात्मा गांधी स्पोर्ट्सला ५गुणांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण ती राखण्यास त्यांना अपयश आले. संघर्षच्या कोमल देवकर, पूजा जाधव यांनी आपला खेळ उंचावत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पण हे सातत्य त्यांना कुमारी गटात राखता आले नाही. कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्सने संघर्षवर ३७-१२ असा सरळ पाडाव करीत महिला गटातील पराभवाचा वचपा काढला. दोन्ही डावात वर्चस्व राखत महात्मा गांधी स्पोर्ट्सने संघर्षला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. मध्यांतराला १७-०९ अशी आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधी स्पोर्ट्सकडून करीना नागवेकर, मंजुषा शेट्टी यांनी दोन्ही डावात लक्षणीय खेळ केला. संघर्षाच्या अक्षदा कदम, सिद्धी सावंत यांचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.

पुरुष व्यावसायिक गटात आर्या एटरप्राईजने बीएआरसीला २२-०६ असे धुवून काढले. योगेश पाटील, किरण कदम या आर्याच्या खेळाडूंच्या झंजावाता पुढे बीएआरसीच्या खेळाडूची मात्रा चालली नाही. पराभूत संघाचा संजय तावडे बरा खेळला.
पुरुष व्दितीय श्रेणी गटात ओवळी क्रीडा मंडळाने अमरज्योत क्रीडा मंडळाचा प्रतिकार २६-२० असा संपवित या गटाचे जेतेपद पटकाविले. सुरभ जाधव, शुभम शिंदे यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत विश्रांतीलाच १३-०५अशी महत्वाची आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर अमरज्योतच्या संकेत व पराग या मोरे बंधूंनी आपला खेळ उंचावत सामन्यात रंगत आणली. पण या खेळाचे विजयात रूपांतर करणे त्यांना जमले नाही.






