ऑरेंज कॅपची शर्यत सध्या अत्यंत चुरशीची झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी या शर्यतीत प्रबळ दावेदार मानला जाणारा वैभव सूर्यवंशी आता बराच मागे पडला आहे, तर अभिषेक शर्मालाही पहिल्या क्रमांकाची खुर्ची सोडावी लागली आहे. सध्या ही कॅप एका परदेशी खेळाडूच्या शिरपेचात असून, टॉप ५ फलंदाजांमधील धावांचे अंतर खूपच कमी आहे. त्यामुळे ही कॅप पुन्हा कधी कोणाकडे जाईल, हे सांगता येत नाही.
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या हेनरिक क्लासेनने सध्या आयपीएल ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. त्याने ११ सामन्यांत ४९४ धावा केल्या आहेत, म्हणजेच तो आता ५०० धावांच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याने आतापर्यंत ३६ चौकार आणि २३ षटकार मारले असून, त्याचा स्ट्राईक रेट १५७.३२ आहे. सनरायझर्स हैदराबादचाच अभिषेक शर्मा या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ११ सामन्यांत ४७५ धावा केल्या असून, त्याच्या नावावर ४३ चौकार आणि ३६ षटकार आहेत.
के.एल. राहुलनेही ही कॅप परिधान केली होती, पण आता तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. राहुलने आतापर्यंत १० सामन्यांत ४४५ धावा केल्या आहेत. त्याने ४४ चौकार आणि २४ षटकार लगावले असून, त्याचा स्ट्राईक रेट १८० पेक्षा जास्त आहे. चौथ्या क्रमांकावरही सनरायझर्स हैदराबादचाच ईशान किशन आहे. त्याने ११ सामन्यांत ४०९ धावा केल्या असून, ४१ चौकार आणि २२ षटकार त्याच्या नावावर आहेत. पहिल्या ४ पैकी ३ फलंदाज सनरायझर्स हैदराबादचेच आहेत, त्यामुळे हा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे, यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही.
एकेकाळी पहिल्या क्रमांकाचा दावेदार असलेला वैभव सूर्यवंशी आता मागे पडला आहे. त्याने १० सामन्यांत ४०४ धावा केल्या आहेत. त्याने ३५ चौकार आणि ३७ षटकार लगावले असून, तो २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, मात्र एक मोठी खेळी त्याला पुन्हा अव्वल स्थानी पोहोचवू शकते. दरम्यान, संजू सॅमसननेही ४०० हून अधिक धावा केल्या असून, तो देखील या कॅपच्या शर्यतीत सामील आहे.






