सनरायझर्स हैदराबादच्या नितिश रेड्डीनं मंगळवारी (10 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाचें योगदान दिलं. त्यानं आधी बॅटनी तुफानी खेळी खेळली. त्यानंतर गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र नितिशसाठी इथपर्यंत पोहचणं अत्यंत अवघड होतं.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, नितिशला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी सरकारी नोकरी सोडून दिली होती. देशात एकीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोकं वाटेल ते करायला तयार असतात, तर दुसरीकडे नितिशच्या वडिलांनी मुलाच्या क्रिकेटमधील करीअरसाठी चक्क सरकारी नोकरीचाच त्याग केला!
नितिश रेड्डीचं कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशातील. नितिश जेव्हा 12-13 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांची बदली उदयपूर येथे झाली होती. मात्र तेथे खेळामधील राजकारण पाहून त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ते आंध्र प्रदेशात परतले. नितिश आंध्र प्रदेशाकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो. आज तो आयपीएलमध्ये जी काही कमालीची कामगिरी करतोय, त्यामागे त्याच्या वडिलांचं मोठं योगदान आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला. मात्र संघाला सुरुवातीलाच झटके बसले. हैदराबादनं 39 च्या स्कोरवर 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नितिश रेड्डी मदतीसाठी धावून आला. त्यानं 37 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 64 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावांपर्यंत मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची टीम विजयाच्या समीप पोहचली होती. मात्र अखेर त्यांना अवघ्या 2 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात नितिश रेड्डीनं गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. त्यानं 3 षटकांत 33 धावा देत एक बळी घेतला. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वविजेत्या कर्णधारानं केलं अनकॅप्ड भारतीय खेळाडूचं कौतुक, पंजाबविरुद्ध एकहाती जिंकवला सामना
रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी विजय
हैदराबाद विरुद्ध शिखर धवननं पहिल्याचं चेंडूवर केली मोठी चूक, अर्शदीप सिंगनं वाचवली पंजाबची इज्जत