कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या कसोटी कारकिर्दीची चांगली सुरुवात केली आहे. आपल्या पदार्पणातच त्याने शतक झळकावले आहे. अय्यरने या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असा सल्ला माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने दिला आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण याने म्हटले आहे की, एकदा विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात परतल्यावर अय्यरचे संघातील स्थान निश्चित राहणार नाही. अय्यरने रवींद्र जडेजाच्या साथीने भारताला पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत आणले होते. अय्यर आणि जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ११३ धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या दिवशी जडेजा लवकर बाद झाला मात्र, श्रेयस अय्यरने एक टोक सांभाळून ठेवले आणि शतक साजरे केले.
प्रसारण वाहिनीशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, “त्याने ही कसोटी संस्मरणीय बनवावी अशी माझी इच्छा आहे. कारण विराट कोहली एकदा परतला की तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल याची शाश्वती नसेल. त्यामुळे, आशा आहे की तो त्याच्या पूर्ण क्षमतेने खेळेल आणि त्याचा पुरेपूर उपयोग करेल.”
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या हस्ते श्रेयस अय्यरला त्याची कसोटी कॅप देण्यात आली. गुरुवारी (२५ नोव्हेंबर) गावसकर यांनी कानपूरमध्ये अय्यरला कसोटी कॅप दिली. यावेळी लक्ष्मण म्हणाला, ‘सुनील गावसकर यांच्याकडून कसोटी कॅप घेणे, ही अय्यरसाठी किती मोठी गोष्ट आहे. मुंबईत लहानाचे मोठे झालेले गावसकर हे अय्यरसाठी आदर्श ठरले असावेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही खेळाडूसाठी कसोटी कॅप घालणे हा मोठा क्षण असतो. मला खात्री आहे की अय्यरसाठी हा एक सुंदर क्षण असेल.
कालच्या ७५ धावांच्या पुढे खेळताना अय्यरने १७१ चेंडूत १०५ धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा सोळावा क्रिकेटपटू ठरला. या यादीत लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत.