इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मात्र शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
असे असले तरीही, काही अंशी मधल्या फळीतील भारतीय फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. प्रामुख्याने भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याचा तसाच खराब फॉर्म इंग्लंड दौऱ्यातही चालू आहे. त्यामुळे पुजारा धावा करण्यात अपयशी ठरत आहे.याच कारणामुळे त्याच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे.
दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. तेव्हा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पुजाराने यात २०६ चेंडूमध्ये ४५ धावा करत आपण लयीत आल्याचे संकेतही दिले होते. असे असूनही ही त्याची लौकिकास साजेशी खेळी ठरली नाही. त्यावेळी संघाला त्याच्याकडून कमीतकमी अर्धशतकाहून अधिक धावांची अपेक्षा होता.
अशात येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पुजाराला संघातून वगळण्याची दाट शक्यता आहे. कारण भारतीय संघात असे ३ खेळाडू उपलब्ध झाले आहेत, जे इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकासाठी पुजाराची जागा घेऊ शकतात. त्याच खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मयंक अगरवाल –
अगरवालला भारतीय संघात पुजाराऐवजी संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण अगरवालने ४५.७४ च्या सरासरीने कसोटीमध्ये १००० पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कसोटी सामन्यांचा मयंक अगरवालला चांगलाच अनुभव आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सरावादरम्यान अगरवालला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या सामनाला मुकावे लागले होते. त्याऐवजी संघात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. राहुलने या संधीचे सोने करत फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. ज्यामुळे येणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलचे संघातील स्थान निश्चित झाले आहे. त्यामुळे मयंक अगरवाल पुजारा ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हनुमा विहारी –
विहारी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विहारीने आतापर्यंत भारतीय संघासाठी बऱ्याचशा कसोटी सामने विजयात महत्त्वाचू भूमिका बजावली आहे. त्याने १२ कसोटी सामन्यांमध्ये ३२.८४ च्या सरासरीने एकूण ६२४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विहारीला कसोटी सामने खेळण्याचा देखील चांगलाच अनुभव आहे. या आधीही त्याने अनेक वेळा चांगले प्रदर्शन केले आहे. तो फलंदाजी सोबत गोलंदाजीतही भारतीय संघाला योगदान देऊ शकतो. त्यामुळे पुजाराचा खराब फॉर्म पाहता विहारीला पुजारा ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादव-
सध्या सूर्यकुमार यादव क्रिकेटजगतात चर्चेचा विषय ठरला आहे. यादवने त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. गेल्या काही काळापासून यादव त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल तसेच श्रीलंका दौऱ्यात देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. याचाच परिणाम म्हणून त्याला इंग्लंड दौऱ्यात निवडण्यात आले होते. अशात पुजाराच्या खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
–धोनीला पछाडत विराटने ‘तो’ दुर्लक्षित विक्रम केला आपल्या नावे
–दुर्दैवच! संधी असूनही मयंकची दुखापत नडली, आता ‘या’ खेळाडूंमुळे कसोटीतील जागा कायमची गेली?
–दिल्ली कॅपिटल्सने रिलीझ केलेल्या गोलंदाजाची ‘डबल लॉटरी’, धोनीच्या सीएसकेत मिळाली जागा?