कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘१४ डिसेंबर’ हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. १९६० साली याच दिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा अंतिम निकाल लागला होता. ब्रिस्बेन येथे झालेला हा सामना बरोबरीत सुटला होता. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणताही सामना बरोबरीत सुटण्याची ही पहिली वेळ होती.
त्यानंतर आतापर्यंत केवळ एकदा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. सप्टेंबर १९८६ ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्याचा असा अंतिम निकाल लागला होता.
ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज कसोटी सामन्याचा अहवाल
ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज संघात ९ ते १४ डिसेंबरदरम्यान मालिकेतील पहिला कसोटी सामना झाला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली होती. पहिल्या डावात सर गॅरी सोबर्स यांनी १३२ धावांची धुव्वाधार खेळी केली होती. सोबतच तत्कालीन कर्णधार सर फ्रँक वॉरेल आणि जो सोलेमन यांनी प्रत्येकी ६५ धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४५३ धावांचा भलामोठा आकडा गाठला होता. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍलन डेविडसन यांनी सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून नॉर्म ओ निल यांनी सर्वाधिक १८१ धावा केल्या होत्या, तर बॉब सिम्पसन यांनीही ९२ धावांचे योगदान दिले होते. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात वेस्ट इंडिजचे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरला होता. त्यांनी पहिल्या डावाअखेर ५०५ धावा केल्या होत्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळवली होती.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना अधिक धावा करता आल्या नाहीत. सर फ्रँक वॉरेल आणि रोहन कान्हई यांच्याव्यतिरिक्त कुणालाही अर्धशतकी खेळीही करता आली नाही. वॉरल यांनी ६५ धावा, तर कान्हई यांनी ५४ धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात २८४ धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍलन डेविडसन यांनी सर्वाधिक ६ फलंदाजांना तंबूत धाडले होते. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचे गोलंदाज सर वेस हॉल यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अधिक धावा करण्यापासून रोखले. त्यांनी एकूण ५ विकेट घेतल्या.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात २३२ धावाच करु शकला. यात ऍलन डेविडसन यांच्या ८० धावांचा वाटा होता. परंतु पहिल्या डावातील ५२ धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या सामन्याअखेर २८४ धावा झाल्या. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाची सामन्याच्या शेवटी बरोबरी झाली. अशाप्रकारे हा सामना कसोटी इतिहासातील पहिला बरोबरीत सुटलेला सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ पाकिस्तानी फलंदाजाची बॅट ओकतेय आग! विराट-रोहितलाही न जमलेला विश्वविक्रम केलाय नावावर
कोहलीवर ट्विटर युजर्स मेहेरबान! धोनीबद्दल विराटने केलेलं ‘हे’ ट्वीट सर्वाधिकवेळा लाईक अन् रिट्वीट
असे तीन दिग्गज गोलंदाज जे सर्वोत्तम फॉर्ममध्ये असताना झाले निवृत्त