भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. मायदेशात असो किंवा परदेशात या संघाला मालिका जिंकण्यात यश आले आहे. आता येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. ही मालिका २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने मालिका जिंकण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India’s tour of South Africa) रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, “अनुभव, विश्वास आणि आत्मविश्वासाच्या बाबतीत आम्ही सध्या मजबूत स्थितीत आहोत आणि यावेळी आम्ही काहीतरी विशेष करून जे हवं आहे ते मिळवू शकतो. तसेच या कठीण परिस्थितीचा सामना करून आम्ही मालिका देखील जिंकू शकतो.”
“दक्षिण आफ्रिका एक अशी जागा आहे, जिथे आम्हाला अजूनपर्यंत एकही मालिका जिंकता आली नाहीये. त्यामुळेच आम्हाला असे करण्याची प्रेरणा मिळते. जिथे जिथे खेळायला जाऊ तिथे तिथे जाऊन मालिका जिंकायची, अशी आमची मानसिकता नेहमीच राहिली आहे.”
अशी राहिली आहे भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेत कामगिरी
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला २ वेळेस त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले आहे, तर यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध देखील २-१ ची आघाडी घेतली होती. परंतु, कोविड -१९ मुळे शेवटचा कसोटी सामना राहून गेला होता.
तसेच दक्षिण आफ्रिकेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाला केवळ ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु, शेवटी १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
दक्षिण आफ्रिकेत जाणवेल रवींद्र जडेजाची कमतरता
रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार आहे. याबद्दल विराट कोहली म्हणाला की, “जडेजा निश्चितच आमच्या संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. तो खेळातील तीनही क्षेत्रात मोलाचे योगदान देत आला आहे जे खूप महत्वाचे आहे, विशेषतः परदेशात. त्याची नक्कीच कमतरता जाणवेल. तरीदेखील आमच्या संघात चांगले खेळाडू उपलब्ध आहेत. जे संघाला सामना जिंकून देण्याच्या स्थितीत पोहचवू शकतात. आम्ही अशी बेंच स्ट्रेंथ बनवली आहे. ज्याला संधी मिळेल तो संधीचा पुरेपूर लाभ घेईल.”
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल मेगा लिलाव: मुंबईचे असणार ‘या’ तीन अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष; लावू शकतात कोट्यावधींची बोली
पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘प्रेक्षक कुठे आहेत?’
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट