जगभरीत उत्कृष्ट टी२० लीगपैकी एक म्हणजे आयपीएल (IPL). आयपीएमधून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू मिळाले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना आयपीएलमुळे स्वतःची वेगळी ओळख बनवण्याची एक खास संधी उपलब्ध झाली. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात फ्रेंचायझी काही युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देत असतात आणि त्यातील काही खेळाडू स्वतःची छाप सोडण्यात यशस्वी ठरतात. मुंबई इंडियन्सने देखील आजपर्यंत अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
मुंबई इंडियन्स (mumbai indians) आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद जिंकले आहे आणि अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळवून दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला जातो, ते म्हणजे जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या सारख्या खेळाडूंचा. आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आगामी हंगामात देखील मुंबई इंडियन्स काही युवा खेळाडूंना संघात सामील करून संधी उपलब्ध करून देईल यात शंका नाही. आपण या लेखात अशात देशातंर्गत क्रिकेटमधील तीन खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांना मुंबई इंडियन्स आगामी हंगामासाठी संघात सामील करू इच्छित असेल.
देशांतर्गत क्रिकेटमधील तीन खेळाडू, जे आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होऊ शकतात
३. अभिनव मनोहर –
देशांतर्गत क्रिकेटमधील कर्नाटक संघाने आतापर्यंत देशाला अनेक खेळाडू दिले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कर्नाटक संघाच्या युवा फलंदाज अभिनव मनोहरचे नाव चर्चेत रहिले. त्याने या स्पर्धेदरम्यान केलेल्या फलंदाजीच्या प्रदर्शनामुळे स्वतःची छाप सोडली. त्याने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये याच वर्षी पदार्पण केले आणि जबरदस्त प्रदर्शन करून दाखवले आहे. या हंगामात खेळलेल्या चार सामन्यांमध्ये त्याने १५० च्या स्ट्राइक रेटने १६२ धावा केल्या. पदार्पण सामन्यात त्याने ७० धावांची दमदार खेळी केली. संघाच्या मधल्या फतीत खेळताना त्याने केलेल्या प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्स संघ मेगा लिलावात या खेळाडूसाठी नक्कीच बोली लावू शकतो.
२. मोहम्मद अजहरुद्दीन –
मोहम्मद अजहरुद्दीनचे प्रदर्शन पाहून आयपीएलच्या मागच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला संघात सामील केले होते. मात्र, आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघासाठी त्याने २०१६ पासून आतापर्यंत ३१ सामन्यांमध्ये १३० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ६०० धावा केल्या आहेत. मुंबईने पुढच्या हंगामापूर्वी ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकसारख्या उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांना रिलीज केले आहे. अशात मेला लिलावात मुंबई इंडियन्स संघ अजहरुद्दीनवर बोली लावू शकतो.
१. आवेश खान –
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये अनेक वेगवान गोलंदाज पाहायला मिळाले आहेत. त्यांच्यातीलच एक आहे मध्यप्रदेशचा आवेश खान. मागच्या काही हंगामांपासून तो आयपीएलमध्ये खेळत आहे. २०२१ मध्ये त्याने सर्वाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. त्याने यावर्षीच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये २४ विकेट्स मिळवल्या. तो हंगामात दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. परंतु, दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले नाही. अशात मुंबई इंडियन्स त्याला मोठी रक्कम मोजून संघात सामील करण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्वाच्या बातम्या –
स्मृती लागली विश्वचषकाच्या तयारीला! व्यक्त केला विजयाचा निर्धार
पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘गर्दी कुठे आहे?’
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट