१८ सप्टेंबर २०२०, आजची तारीख. आजपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाची सुरुवात होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. अशात क्रिकेटवेड्या भारत देशाचे रहिवासी घड्याळाकडे त्यांची नजर टिपून बसले असणार. कोण आपल्या आवडत्या मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाची स्वप्ने पाहण्यात व्यस्त असेल, तर कोण चेन्नई सुपर किंग्सच्या धोनीचे स्टेटस लावण्यात. थोडक्यात सांगायचं झालं तर, जरी यावर्षी कोरोना विषाणूमुळे चाहते स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या संघाला किंवा खेळाडूला चियर करु शकणार नसतील, तरी घरी बसूनही त्यांची उत्सुकता कमी होणार नाही.
आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा विजेतेपद जिंकणारे मुंबई आणि चेन्नई हे संघ सतत चर्चेत असतात. असे असले तरी, यावर्षी या २ संघांना टक्कर देत दिल्ली कॅपिटल्स हा संघदेखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. गतवर्षी दिल्लीने पूर्ण हंगामात दमदार प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु, यावर्षी दिल्लीला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे.
पण, गेल्या १२ हंगामांपासून आयपीएल ट्रॉफी पटकावण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला यावर्षी विजयाचा दावेदार का समजले जात आहे?, हा प्रश्न सर्वांना सतावत असेल. आम्ही तुम्हाला, या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देणार आहोत. सुरुवात करुयात दिल्लीच्या पहिल्या आयपीएल हंगामातील इतिहासापासून.
आयपीएल २००८मध्ये भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. या धुरंदर भारतीय खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण राजस्थान रॉयल्स संघाने त्यांना पराभूत करत अंतिम सामन्याची दारे बंद केली. त्यानंतर पुढील आयपीएल हंगामातही संघाने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास गाठला.
त्यानंतर आयपीएल २०१० आणि २०११ मध्ये संघ साखळी फेरीपर्यंतच मर्यादित राहिला. पुढे २०१२ मध्ये संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही त्यांना आयपीएल ट्रॉफी पटकावता आली. त्यानंतर २०१३ पासून ते २०१८ पर्यंत संघाचे प्रदर्शन जास्त चांगले राहिले नाही. पण २०१९ मध्ये भारताचा धुरंदर फलंदाज श्रेयस अय्यरने संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे हाती घेतली आणि त्याने संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवले. यावर्षीही अय्यरच दिल्लीचे नेतृत्त्व करणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षेत वाढ झाली आहे.
याबरोबरच दिल्लीने यंदा ट्रॉफी पटकावत इतिहास रचण्याच्या उद्देशाने वेगळा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी डिसेंबर २०१९मध्ये पार पडलेल्या आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंच्या निवडीवर जास्त भर दिला आहे. सहसा फ्रंचायझी लिलावात एकाहून एक दमदार परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करताना दिसतात. पण दिल्लीने याउलट पद्धत वापरत भारतीय दिग्गजांना संघात स्थान दिले आहे. त्यामुळे संघात युवा आणि दिग्गज खेळाडूंचे जोरदार संतुलन निर्माण झाले आहे.
दिल्ली संघाने अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन या अनुभवी भारतीय खेळाडूंना आयपीएल २०२० साठी प्लेअर ट्रेडिंगमधून संघात घेतले आहे. त्यांच्यासह शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत असे दमदार भारतीय खेळाडूही आधीपासूनच संघाचा भाग आहेत. याबरोबरच वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर, ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स कॅरी आणि मार्कस स्टोइनिस हेदेखील यावर्षी दिल्लीत सामील झाले आहेत. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे.
पण कोणताही संघ कितीही मजबूत असला तरी, त्यांची काही-ना-काही उणीव (कमजोरी) असतेच आणि इतर संघ विरुद्ध संघाच्या उणिवेचा मोठ्या प्रमाणात फायदा उठवतात.
शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, ऍलेक्स कॅरी हे नक्कीच दिल्लीच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असतील. पण हे सर्व खेळाडू वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाज आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कोणी गोलंदाजी करणे अशक्य आहे. अशात कर्णधार अय्यरला मार्कस स्टोइनिस आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला गोलंदाजीसाठी पाठवावे लागणार आहे. त्यातही स्टोइनिस मधल्या फळीत फलंदाजी करण्याची भूमिका निभावतो, त्यामुळे तो पूर्ण ४ षटके गोलंदाजी करण्याची शक्यता कमी आहे. पण जर स्टोइनिसच्या जागी अय्यरने पटेलची निवड केली, तर पुन्हा फलंदाजीची समस्या निर्माण होऊ शकते.
अशात आर अश्विनव्यतिरिक्त गोलंदाजीची पूर्णपणे जबाबदारी ही कागिसो रबाडावर असणार आहे. पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि एनरिक नॉर्किये हेदेखील रबाडाला सहयोग करताना दिसतील. परंतु, जर खेळताना सुरुवातीच्या काही सामन्यात रबाडाला दुखापत झाली, तर संघापुढे खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
यावरुन तुम्हा सर्वांच्या लक्षात आले असेल की, काही उणिवा असल्या तरी दरवर्षीपेक्षा यावर्षीचा दिल्ली कॅपिटल्स संघ खूप मजबूत आहे. सोबतच संघाला रिकी पाँटिंगसारखा प्रशिक्षकही लाभला आहे. त्यामुळे यंदा दिल्लीच्या विजेता ठरण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
आयपीएल २०२० साठी असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ-
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोईनिस, ऍलेक्स कॅरी, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, ललित यादव.
ट्रेंडिंग लेख –
रोहित-सचिन तर सर्वांनाच माहित आहे, परंतू हे ५ सितारेही झाले होते मुंबईचे कर्णधार
इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका
एकेवेळी मैदानावर बसून ढसाढसा रडणारा क्रिकेटर, ज्याने १९व्या वर्षीच मुंबईत मिळवली जागा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली तलवार भेट
सीएसकेला चौथे विजेतेपद मिळवण्यात ‘ही’ गोष्ट ठरणार सर्वात मोठा आडथळा