आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. आगामी विश्वचषकात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील. या सामन्यासाठी जगभरातील चाहते आतुर आहेत. त्याचवेळी पाकिस्तान संघाचे संचालक व मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी या सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरला होईल. जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांना आपल्या संघाचा पराभव होऊ नये, अशी इच्छा असते. त्यामुळे दोन्ही संघांवर दडपण असते. वनडे विश्वचषकाचा विचार केल्यास भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध अद्याप एकही सामना हरलेला नाही. उभय संघ विश्वचषकात आत्तापर्यंत सात वेळा आमने-सामने आले असून, प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय संपादन केलेला आहे.
याच मुद्द्यावरून एका मुलाखतीत बोलताना आर्थर म्हणाले,
“भारत आणि पाकिस्तान या सामन्याला मी सर्वस्व मानत नाही. एक चाहत्याच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास लोक अत्यंत भावनिक होतात. मात्र, मला विचाराल तर एक प्रशिक्षक म्हणून या सामन्यातून दोन गुण मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. एक संघ ते दोन गुण घेऊन पुढे जाईल. तर, एक संघ पराभूत होईल.”
आर्थर यांनी या मुलाखतीत भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार असल्याचे देखील कबूल केले. भारतीय संघ मायदेशात खेळण्याचा दबाव कसा झेलतो, यावर संघाचे वाटचाल अवलंबून असेल असे ते म्हटले.
(Pakistan Head Coach Micky Arthur Said India Pakistan Match Not Everything)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: वर्ल्डकपआधी बांगलादेशला जबर धक्का! कर्णधार तमिम इक्बालची तडकाफडकी निवृत्ती
तिसऱ्या कसोटी आधीच कमिन्सने उडवला धुरळा! इंग्लंडला आव्हान देत म्हणाला, “आम्ही पुन्हा…”