शुक्रवारपासून इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेला सुरुवात होत आहे. हा या स्पर्धेचा १४ वा हंगाम आहे. केवळ ३ दिवस राहिलेल्या स्पर्धेबद्दलच्या चर्चांना तसेच त्यात सहभागी होणाऱ्या संघांच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. तसेच अनेक माजी क्रिकेटपटूही सध्या संघांबद्दल विविध अंदाज व्यक्य करत आहेत. असेच सध्या मुंबई इंडियन्ससाठी टीम स्कॉटची भूमीका निभावणाऱ्या पार्थिव पटेलनेही मोठे भाष्य केले आहे.
पार्थिवने नुकचे स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे की ‘आयपीएल ही एक मनोरंजक स्पर्धा आहे, जिथे प्रत्येकजणांना छाप पाडण्याची इच्छा असते. आत्तापर्यंत विराट कोहलीने ज्याप्रकारे खेळ केला आहे, ख्रिस गेलने ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, केकेआरने जसे क्रिकेट खेळले आहे, हे सर्व मी पाहिले आहे. पण यासर्व गोष्टींमध्ये मला एक विक्रम बनताना पाहायचा आहे ते म्हणजे विजेतेपदाची हॅट्रिक, जी अजून कोणीही केली नाही. माझी इच्छा आहे की मुंबई इंडियन्सने यावर्षी विजेतेपद जिंकून हा विक्रम करावा आणि हा विक्रम मला तुटलेलाही पाहायचा आहे.’
मुंबई इंडियन्सने जिंकली आहेत मागील सलग २ विजेतीपदे
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा सध्या सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आत्तापर्यंत ५ आयपीएल विजेतीपदे जिंकली आहेत. त्यातील चौथे आणि पाचवे विजेतेपद त्यांनी २०१९ आणि २०२० अशा सलग २ हंगामात जिंकले आहे. त्यामुळे यंदा त्यांना विजेतेपदाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. जर मुंबई इंडियन्सने २०२१ आयपीएल हंगामाचे विजेतेपद जिंकले तर सलग ३ आयपीएल विजेतेपद जिंकणारा त्यांचा पहिलाच संघ ठरेल.
चेन्नई सुपर किंग्स पोहचला होता विजेतेपदाच्या हॅट्रिकजवळ
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सलग २ हंगामात विजेतेपद जिंकण्याचा कारनामा केवळ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सलाच करता आला आहे. चेन्नईने २०१० आणि २०११ च्या आयपीएल हंगामात सलग २ विजेतेपदे जिंकली होती. तसेच त्यांना सलग तिसरे विजेतेपद जिंकण्याचीही संधी चालून आली होती.
साल २०१२ च्या आयपीएल हंगामातही त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तसेच सलग तिसरे आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्नही भंगले होते.
चेन्नईनंतर आता केवळ मुंबई इंडियन्सच या विक्रमाच्या जवळ पोहचले आहेत. त्यामुळे या आयपीएल हंगामात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल की मुंबई इंडियन्स सलग तिसरे विजेतेपद जिंकणार की नाही.
पार्थिवने मागीलवर्षी घेतली आहे निवृत्ती
पार्थिव पटेलने मागीलवर्षी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर लगेचच त्याची मुंबई इंडियन्स संघाचा ‘टॅलेंट स्काउट’ या जबाबदारीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. ‘टॅलेंट स्काउट’ चा अर्थ असा की, तो युवा खेळाडूंमधील प्रतिभा शोधेल, ज्यामुळे भविष्यामध्ये संघात दमदार खेळाडूंचा भरणा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा ५ परदेशी खेळाडू खेळवण्यात आले अन् घडले असे काही की…
‘या’ खेळाडूने कधीकाळी पैशामुळे सोडले होते क्रिकेट, आज आयपीएलमुळे झालाय कोट्याधीश






