मुंबई, दि.२३ (क्री.प्र.)-मंजिरी गावडे आणि कृतिका कुमार यांनी ८८ धावांच्या दणदणीत सलामीच्या जोरावर उभारलेल्या ३ बाद १४० या आव्हानाचा पाठलाग करण्यात भारत क्रिकेट क्लब अपयशी ठरला. केतकी धुरेच्या ६७ धावांच्या झुंजार खेळीला एकाही फलंदाजाची साथ न लाभल्यामुळे भारतचा संघ ११६ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने २४ धावांच्या विजयासह प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता त्यांची गाठ पालघर-डहाणु तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा (पीडीटीएसए) सहज पराभव करणार्या राजावाडी क्रिकेट क्लबशी पडेल.
माहिम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याने प्रकाश पुराणिक यांच्या स्मरणार्थ महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणार्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करत मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेल्या संधीचे सोने केले. आज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीडीटीएसएच्या खेळाडूंनी घोर निराशा केली. स्पर्धेतील एकमेव शतक झळकावणार्या शर्वी सावे अवघ्या ४ धावांवर बाद झाल्यावर स्नेहलता धांगडा आणि सिद्धेश्वरी पागधरे यांनी ४९ धावांची महत्त्वपूर्ण भागी रचली. पण ही जोडी फुटल्यानंतर पीडीटीएसएच्या फलंदाजांनी ४४ चेंडूंत केवळ २२ धावाच काढल्यामुळे राजावाडीने त्यांना ७६ धावांवर रोखण्यात यश मिळवले. त्यानंतर ७७ धावांचे माफक आव्हानाचा पाठलाग राजावाडीचीही घसरगुंडी उडाली. अश्विनी निशादने डावाच्या पहिल्याच षटकांत वृषाली भगतला शून्यावरच बाद केले. मग किमया राणेला अश्विनीनेच बाद करत आपल्या संघाला सामन्यात आणले. पुढच्याच षटकांत निविया आंब्रेला शून्यावरच धावचीत करत राजावाडीची ३ बाद २२ अशी अवस्था केली. पण सलोनी कुष्टे (१७) आणि क्षमा पाटेकर (ना.२३) यांनी चौथ्या विकेटसाठी ३४ धावांची भागी रचत संघाला विजायसमीप नेले. त्यानंतर तुशी शाहबरोबर २३ धावांची अभेद्य भागी रचत राजावाडीला १७.२ षटकांत संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
त्याअगोदर दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या मंजिरी गावडे आणि कृतिका कुमारने ८८ धावांची खणखणीत भागी रचल्यामुळे ते २० षटकांत ३ बाद १४० अशी जबरदस्त मजल मारू शकले. या धावांचा पाठलाग करताना केतकी धुरेने ६७ धावांची नाबाद खेळी करताना संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण अन्य फलंदाजांच्या निराशाजनक खेळामुळे त्यांचा संघ ११६ धावांपर्यंत पोहोचू शकला आणि वेंगसरकर फाऊंडेशनच्या महिलांनी पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आपल्या नावाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक
पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन : २० षटकात ७ बाद ७६ (स्नेहलता धांगडा २१, सिद्धेश्वरी पागधरे ३१; दिक्षा पवार १५/२, वृषाली भगत ४/१), राजावाडी क्रिकेट क्लब : १७.२ षटकात ४ बाद ७९ (सलोनी कुष्टे १७, किमया राणे १९, क्षमा पाटेकर ना. २३; अश्विनी निशाद १७/२)
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : २० षटकात ३ बाद १४० (मंजिरी गावडे ४६, कृतिका कृष्णकुमार ४६, सिमरन शेख ना. २८; निर्मिती राणे २०/२),भारत क्रिकेट क्लब : २० षटकात ७ बाद ११६ (केतकी धुरे ना. ६७, राजसी नागोसे १९; आदिती सुर्वे २०/२, पुनम राऊत १६/१)
महत्वाच्या बातम्या –
IND Vs ENG : आकाश दीपच्या नो बॉलमुळे चाहत्यांना आठवला बुमराह, अन् मग रोहित शर्माने उचलला…
IND vs ENG । स्मिथ, पाँटिंग आणि विव्ह रिचर्ड्सवर जो रुट भारी! कसोटी क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास