येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारत विरुद्ध सिलेक्ट काऊंटी इलेव्हेन या दोन्ही संघामध्ये झालेल्या सराव सामन्यात आणखी दोन खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान दुखापतग्रस्त झाले आहेत. ज्यामुळे हे तिन्ही खेळाडू इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत.
या खेळाडूंऐवजी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडला बोलावण्यात आले आहे. परंतु हे खेळाडू सध्या श्रीलंकेत आहेत. त्यामुळे हे खेळाडू कधी आणि कोणत्या मार्गे इंग्लंडला जातील हे अद्याप अस्पष्ट आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामना खेळण्यापासून वंचित राहावे लागू शकते. १२ ऑगस्ट रोजी दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. तोपर्यंत त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. असे म्हटले जात आहे की, श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका संपल्यानंतर हे दोघेही खेळाडू इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत. (Prithvi shaw and suryakumar yadav will available for selection from the second test match against England)
अशी राहिलीय सूर्यकुमार आणि पृथ्वीची कामगिरी
युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ने २०१८ मध्ये राजकोटच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तसेच पदार्पणाच्या सामन्यात त्याने ९९ चेंडूंवर शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला अनेकदा संधी देण्यात आली होती. परंतु तो संधीचे सोने करण्यास अपयशी ठरला होता. २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत देखील त्याला संधी देण्यात आली होती. परंतु पहिल्याच कसोटी सामन्यात तो आपली छाप सोडण्यास अपयशी ठरला होता. ज्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत एकूण ५ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४२.३८ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे.
तसेच मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवची गेल्या काही महिन्यातील कामगिरी पाहता त्याला या दौऱ्यावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ७७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४४.०१ च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १४ शतक आणि २६ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
संजूला बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाची ‘चिटिंग’! मग फलंदाजाने शिकवला चांगलाच धडा
विकेट मिळताच गोलंदाजाची कॉमेंट्री बॉक्समध्ये धाव, हुंकार भरत केलं हटके सेलिब्रेशन; बघा व्हिडिओ