भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यावरील काही खेळाडूंना दुखापत झाली असल्याने पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि फिरकीपटू जयंत यादव यांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाठवण्याची तयारी सुरू आहे. दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खानच्या जागी या तिघांना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येणार आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने दोन फलंदाज आणि एका फिरकीपटू बदली खेळाडूच्या रुपात पाहिजे असल्याची निवड समितीशी चर्चा केली होती. यानंतर आता अशी माहिती पुढे येत आहे की, संघ व्यवस्थापनाला पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि जयंत यादव हे तीन खेळाडू हवे आहेत. जयंत यादव गोलंदाजीबरोबर आवश्यकतेनुसार फलंदाजी देखील करू शकतो. त्यामुळे तो अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची जागा घेऊ शकतो.
शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती आणि तो मायदेशी परतला आहे. तर वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचे आगामी कसोटी मालिकेतून बाहेर होणे जवळपास निश्चित आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि जयंत यादव या तीन खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्याची तयारी करत आहे. शॉ आणि सूर्यकुमार सध्या श्रीलंका दौर्यावर आहेत, जिथे त्यांनी नुकतीच एकदिवसीय मालिका खेळली आहे. पुढे त्यांना टी20 मालिका खेळायची आहे. चेतन शर्मांच्या नेतृत्त्वाखालील निवड समिती आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात या २ खेळाडूंवरुन बोलणेही झाले आहे. दुसरीकडे तिसरा खेळाडू कोण असेल हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु जयंतला पाठवण्याची दाट शक्यता आहे. तो सध्या भारतात आहे.
याबरोबरच श्रीलंका दौऱ्यावर असलेले सूर्यकुमार आणि शॉ इंग्लंडला कधी आणि कोणत्या मार्गे रवाना होतील, हेदेखील अजून पुढे आलेले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे.
सूर्यकुमार, शॉ आणि जयंतची मागणी केली जाण्यामागचे कारण-
यापूर्वी गिलला दुखापत झाली तेव्हाच भारतीय संघाने शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवड समितीकडे केली होती. पण बीसीसीआयने ही मागणी फेटाळून लावली होती. पण जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानंतर बीसीसीआयने याबाबतीत आपला विचार बदलला आहे. इंग्लंड दौर्यासाठी 23 खेळाडूंची निवड केली गेली होती. त्यापैकी 19 मुख्य खेळाडू आहेत तर 4 स्टॅण्डबाय खेळाडू आहेत.
याव्यतिरिक्त भारतीय संघाजवळ सलामीवीर फलंदाज म्हणून मयंक अग्रवाल, केएल राहुल, रोहित शर्मा आणि स्टॅण्डबाय खेळाडू अभिमन्यू ईश्वरन हे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापक ईश्वरनबाबत गंभीर विचार करत नाहीयेत. त्याचे कारण असे सांगितले आहे की, नेट्समध्ये सरावादरम्यान त्याने प्रभावी फलंदाजी केली नाही. याच कारणामुळे पृथ्वी शॉची मागणी होत आहे.
आवेश खानला देखील पहिल्या सराव सामन्यादरम्यान हनुमा विहारीने मारलेल्या शॉटमुळे दुखापत झाली होती. तर वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला आधीपासूनच दुखापत झाली होती. सुंदर जवळ जवळ दीड महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टनच्या जागी जयंत यादवची मागणी केली जात आहे. जयंतने या अगोदर साल 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. याबरोबर जयंतने कसोटीत शतकी खेळी देखील केली होती. परंतु संघ व्यवस्थापकांनी आवेश खानच्या जागी कोणत्याही खेळाडूची मागणी केली नाही. कारण भारतीय संघाजवळ पर्याय म्हणून वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या जागी सुर्यकुमार यादवची निवड केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रहाणे सध्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. या कारणामुळे तो सराव सामन्यात खेळला नाही. त्याला इंजेक्शन्स घ्यावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
व्यस्त वेळापत्रकातही शॉने प्रेयसीसाठी काढला वेळ, मध्यरात्री ‘या’ अंदाजात केले बड्डे विशेष,
अरेरे… ‘कोहली’ अतिशय दुर्देवीपणे धावबाद; गल्ली क्रिकेटमध्येही असा रनआऊट पाहिला नसेल!
सूर्यकुमारच्या विकेटच्या निर्णयावरुन तिसरे पंच पेचात, भारतीय दिग्गजाने ‘असे’ केले ट्रोल