भारतीय क्रिकेट संघ नुकताच यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. या दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये २-१ फरकाने पराभूत करत इतिहास रचला. या कसोटी मालिकेदरम्यान ३ वेगवेगळ्या भारतीय खेळाडूंनी उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळली होती. मात्र भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू आर अश्विन याला या पदासाठी दुर्लक्षित करण्यात आले. आता अश्विनने यासंदर्भात भाष्य केले आहे.
बॉर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्त्व रजा घेत मायदेशी परतला होता. त्यामुळे उर्रवित तीन सामन्यात उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्त्व केले होते. यावेळी मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा याच्यावर उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु तिसऱ्या कसोटीतून फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन झाल्याने पुजाराला हटवून रोहितला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते.
अशाप्रकारे अनुभव आणि कौशल्य असूनही अश्विनला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली नाही. यानंतर अश्विनने सर्वांचे मन जिंकणारे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “मला संघाचा उपकर्णधार बनण्याची संधी न दिल्याने मी अजिबात निराश नाही. तिथे गेल्यानंतर मी स्वत:ची योजना बनवली आणि त्यानुसार मला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळाल्या. जर आपण आपल्या संघातील एखाद्या सहकाऱ्याची मदत करत असू, तर तेही एकप्रकारचे नेतृत्त्वच आहे.”
विराट आणि रहाणेची नेतृत्त्व शैली सारखीच- अश्विन
तसेच पुढे विराट आणि रहाणे यांच्या नेतृत्त्वाविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, “मला कोणाच्याही नेतृत्त्वावरुन त्यांची तुलना करायला अजिबात आवडत नाही. माझ्या मते, भारतीय संघाला लाभलेले दर्जेदार खेळाडू आणि ड्रेसिंग रूममधील त्यांची मनमिळावू वृत्ती; यामुळे मागील काही वर्षात आम्हाला भरघोस यश साध्य झाले आहे. विराट हा स्वभावाने बोलका आणि लवकर सर्वांमध्ये मिसळणारा व्यक्ती आहे. रहाणे अगदी याउलट स्वभावाचा व्यक्ती आहे. परंतु त्यांची दोघांचीही नेतृत्त्व पद्धती जवळपास सारखी आहे.”
कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स अश्विन दुसराच
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ३ सामने खेळले आहेत. या सामन्यांतील ६ डावात गोलंदाजी करताना त्याने २८.८३च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला सर्वाधिक ३ वेळा तंबूत धाडले आहे. यासह अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सर्वाधिक १३ विकेट्ससह अव्वलस्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
होय, पक्काच..! चेन्नईतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाच जिंकणार? असं आम्ही नाही ‘हे’ आकडे सांगतायेत
सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल जो रूट, माजी दिग्गजाची भविष्यवाणी
जो रूट म्हणाला चंडी लवकर बाद हो अन् तो खरंच…, पाहा मजेशीर व्हिडिओ