भारतीय संघाने जयपूर आणि रांचीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर कोलकातामध्येही न्यूझीलंडचा टी२० सामन्यांत पराभव केला. न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने ७३ धावांनी विजय मिळवला आणि यासह भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्वीप दिला.
भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडचा सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीप केला. याआधी भारतीय संघाने न्यूझीलंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर ५-० असा धुव्वा उडवला होता. भारतीय संघाच्या मोठ्या विजयानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय खेळाडूंना एक मोठा आणि मार्मिक सल्ला दिला आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर बोलतांना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल द्रविड यांनी म्हटले की, ‘टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळून त्यानंतर सहा दिवसात तीन टी२० सामने खेळणे न्यूझीलंड संघासाठी खरोखरच सोपे नव्हते. त्यामुळे आम्ही आमचे पाय जमिनीवरच राहू देणे योग्य ठरेल.’ राहुल द्रविड यांचा सल्ला भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कोलकाता टी-२० मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात १८४ धावा केल्या. रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पण यावेळी भारतीय कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित आणि इशान किशनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या ३८ चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, मिचेल सँटनर गोलंदाजीला येताच भारतीय संघ पिछाडीवर गेला. इशान किशन २९ धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. रिषभ पंतही अवघ्या ४ धावा करून बाद झाला.
रोहित शर्मा खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकावल्यानंतर काही वेळातच ईश सोधीने रोहितचा उत्कृष्ट झेल घेत भारतीय संघाला चौथा धक्का दिला.
श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी उपयुक्त फलंदाजी केली. श्रेयसने २५ आणि व्यंकटेशने २० धावा केल्या. अखेरीस हर्षल पटेलने ११ चेंडूत १८ धावा आणि दीपक चहरने ८ चेंडूत २१ धावा केल्या. दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला १८४ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाला लक्ष्य गाठता आले नाही आणि त्यांचा डाव केवळ १११ धावांवर आटोपले. न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ५१ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने अवघ्या ९ धावांत ३ बळी घेतले. हर्षल पटेलने २ बळी घेतले. युजवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यर आणि दीपक चहर यांनी १-१ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
भावाने नादचं केलाय थेट! नियमित कर्णधार म्हणून पहिल्याच टी२० मालिकेत रोहित बनला ‘मॅन ऑफ द सिरीज’
एक धाव वाचवण्यासाठी इतका धडपडला, न्यूझीलंडच्या फिलिप्सच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करावे तितके कमीच!