जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना भारतीय संघाने गमावला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी दारुण पराभव केला. या पराभवामुळे भारताच्या 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या. या पराभवानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचाही समावेश आहे. द्रविड भारताच्या पराभवानंतर निराश झाला. त्याने म्हटले की, ऑस्ट्रेलिया संघाने चांगले क्रिकेट खेळले. ते विजयाचे हक्कदार होते. यानंतर त्याने भारतीय फलंदाजांबद्दल नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाला राहुल द्रविड?
डब्ल्यूटीसी अंतिम सामना (WTC Final) गमावल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, “हे कठीण आव्हान होते, पण तुम्ही कितीही मागे असला, तरीही काही आशा असतेच. मागील दोन वर्षात अनेक कसोटी सामने राहिले आहेत, जिथे आम्ही लढून पुनरागमन केले. आम्हाला मोठ्या भागीदारीची गरज होती, पण ऑस्ट्रेलिया सामन्यात दबाव बनवला. ही 469 धावांची खेळपट्टी नव्हती, पण आम्ही पहिल्या दिवशी अंतिम सत्रात खूप धावा खर्च केल्या.”
पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांची लाईन लेंथ खराब नव्हती, पण आम्ही खूप बाहेर गोलंदाजी केली. ट्रेविस हेडला खूप जागा दिली.” संघाच्या फलंदाजीवर बोलताना द्रविड म्हणाला की, “आमचे अव्वल पाच फलंदाज खूपच अनुभवी आहेत. हे खेळाडू ऑस्ट्रेलियात जिंकले आहेत, पण इंग्लंडमध्ये त्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करू शकले नाहीत. मी मान्य करतो की, ही खेळपट्टी चांगली होती, पण आमच्या फलंदाजांनी निराश केले.”
सलग दुसऱ्यांदा भारताचा पराभव
विशेष म्हणजे, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभूत व्हावे लागले. अंतिम सामन्यात भारताला चौथ्या डावात 444 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, भारत 234 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का सहन केला. यापूर्वी भारत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता. (rahul dravid on team india defeat in wtc final 2023 ind vs aus)
महत्वाच्या बातम्या-
रोहित-गिलचे खराब प्रदर्शन ते अश्विनला बाहेर बसवण्यापर्यंत, ‘या’ आहेत WTC Finalमधील भारताच्या चुका
WTC Finalsमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज, 18 महिन्यांनी कमबॅक करणारा रहाणे दिग्गजांवर भारी